
Jalgaon News : खानदेशात पावसाअभावी पेरण्या लांबलणीवर पडत आहेत. हलका ते मध्यम पाऊस होत आहे. दुसरीकडे पेरण्यांसाठी दिलासादायक पाऊस अनेक भागात नसल्याने अडचणी येत असून, दुबार पेरणीची वेळ येईल, अशी स्थिती तयार झाली आहे.
खानदेशात मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये पाऊस कमी दिसत आहे. मे महिन्यात ६ मे ते २७, २८ मे पर्यंत पाऊस झाला. या कालावधीत काही भागात अधिक तर काही भागात हलका, मध्यम पाऊस होता.
वादळी पावसाचा फटकाही या कालावधीत बसला. पण मे मधील पाऊस जूनच्या तुलनेत अधिक झाल्याचे दिसत आहे. मे अखेरीस पाऊस नव्हता. नंतर शेतकऱ्यांनी धावपळ करून शेती तयार केली. ११ जून रोजी वादळी पाऊस, गारपीटही झाली. यानंतर पेरण्यांना खानदेशात सुरुवात झाली. परंतु जोरदार, पेरणीयोग्य पाऊस अनेक भागात नसल्याने अडचण तयार झाली आहे. कृषी विभागाने वारंवार पेरणी टाळा, पुरेसा पाऊस येवू द्या, असे आवाहन केले.
पण सोयाबीन, उडीद, मूग या पिकांच्या पेरणीची मुदत संपत असल्याचे लक्षात घेऊन आणि पाऊस येईल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मुगाची पेरणी केली. परंतु त्यावर हवा तसा पाऊस नाही. जळगाव जिल्ह्यात जामनेर, यावल, रावेर, अमळनेर, जळगाव या भागात दुबार पेरणीचे संकट आहे.
कारण या महिन्यात हवा तसा पाऊस झाला नाही. शासनाकडून प्राप्त माहितीनुसार फक्त १४ ते १५ दिवस जूनमध्ये पाऊस झाला. त्यातही रावेर, यावल भागात हवा तसा पाऊस नव्हता. अमळनेर, पारोळा तालुक्यात फक्त १० ते १२ दिवस या महिन्यात पाऊस झाला. त्यातही सातत्य नव्हते. सर्वदूर पाऊस नसल्याने दुबार पेरणीची समस्या आहे.
मंगळवारी (ता. २४) अनेक भागांत पाऊस झाला. परंतु मध्यम ते हलका पाऊस झाला. अनेक भागांत पाऊस नव्हता. जळगाव तालुक्यातील काही मंडलांत बरा दिसव पाऊस झाला. त्याने दिलासा मिळाला. जूनमध्ये जळगाव जिल्ह्यात १३० मिलिमीटरपर्यंत पाऊस अपेक्षित असतो.
पण पाऊस एकूण ८० मिलिमीटरदेखील झालेला नाही. यावल, रावेर भागात ५० ते ५५ मिलिमीटरपर्यंत एकूण पाऊस झाला आहे. अशीच स्थिती धुळे व नंदुरबारमध्येही आहे. धुळ्यातील साक्री भागात स्थिती बरी आहे. पश्चिम भागात मात्र भात लागवडीसाठी पुरेसा पाऊस नाही.
जळगाव जिल्ह्यात २४ टक्के पेरणी
जेथे पेरण्या झाल्या, तेथे पावसाची प्रतीक्षा आहे. तर जेथे पेरण्या नाहीत, तेथेही पाऊस हवा आहे. पाऊस नसल्याने पेरण्या सुरू नाहीत. शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका पेरणी, लागवड थांबविली आहे. या आठवड्यात पेरण्यांची गती अल्प आहे.
फक्त जळगाव, चोपडा तालुक्यातील काही मंडलांत पेरण्या झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात पेरणी सुमारे २४ टक्के झाली आहे. या महिन्यातील पेरणीची टक्केवारी ४० टक्क्यांवर अपेक्षित होती. धुळे व नंदुरबारमध्येही पेरणीची टक्केवारी तीसपर्यंतदेखील नसल्याची माहिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.