Bordi News : शहरातील घाऊक बाजारपेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चिकूचे बाजारभाव कमी झाले आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी चिकू खरेदी बंद केली आहे. परिणामी, बागातदारांवर मोठे संकट कोसळले आहे. झाडांवर तयार झालेल्या फळांचे काय करायचे, असा प्रश्न भेडसावू लागला आहे.
सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून चिकूचा हंगाम सुरू होतो; मात्र मागच्या वर्षी मेच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात बिपोरजॉय चक्रीवादळाचा फटका बसला होता. त्यामुळे या वर्षी चिकूचा हंगाम डिसेंबरऐवजी फेब्रुवारीत सुरू झाला. उशिरा फळांची आवक सुरू झाल्यामुळे शहराच्या बाजारपेठेत सुरुवातीपासूनच मंदीचा सामना करावा लागला आहे. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान सणामध्ये फळांचे बाजारभाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती; मात्र या काळातही बाजारभावात फारशी सुधारणा झाली नाही.
प्रतिकिलो सात ते आठ रुपयांप्रमाणे फळे विकली गेली. त्यामुळे फळे तोडण्याचा प्रतिकिलो चार रुपये खर्च वजाजाता शेतकऱ्याला तीन ते चार रुपये प्रतिकिलो यावरच समाधान मानावे लागले होते. दरम्यानच्या काळात बाजारभाव सुधारतील, या अपेक्षेने शेतकरी बाजारात नियमितपणे फळे पाठवत असतानाच अचानक शहराच्या बाजारपेठात चिकूचे बाजारभाव प्रतिकिलो तीन ते चार रुपये असल्याच्या सूचना व्यापाऱ्यांनी दिल्यामुळे बागायतदार हतबल झाला आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.