
Nagpur News : पशुखाद्यातील घटकांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यास नेमक्या कोणत्या घटकांचा पशुखाद्य तयार करण्याकामी वापर केला, याची माहिती बॅगवर नमूद असावी, असा शासन निर्णय १४ जुलै रोजी काढण्यात आला. मात्र महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतर देखील या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पशुपालकांमध्ये साशंकता आहे.
पशुखाद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीच्या परिणामी शेतीपूरक पोल्ट्री व दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांचा उत्पादकता खर्च वाढतो. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर करारावरील पोल्ट्री व्यवसाय होतो. त्यामुळे कंपन्यांकडून बाजारात अस्थिरता निर्माण करण्यासाठी कमी प्रतीचे खाद्य पशुपालपाकांना पुरविले जाते, असा संशय सातत्याने व्यक्त केला जातो. त्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी त्यांच्या पशुखाद्याची तपासणी प्रयोगशाळेत करावी. त्यासोबतच पशुखाद्यात समाविष्ट घटकांची माहिती स्पष्टपणे बॅगवर नोंदवावी, असा शासन निर्णय काढण्यात आला.
तब्बल २२ ते २३ वर्षांनंतर शासनाने यासाठी पुढाकार घेतल्याने पशुपालकांनी समाधान व्यक्त केले. परंतु शासन निर्णयाला महिनाभराचा कालावधी होऊनही अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, कंपन्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही, असा साशंकता पशुपालक व्यक्त करीत आहेत. पशुखाद्याच्या बॅगवर त्यातील घटकांची माहिती नोंदविल्यास कंपन्या नेमक्या कशासाठी जादा पैसे आकारतात, हे कळणार आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी लवकर व्हावी, अशी पशुपालकांची मागणी आहे.
पशुसंवर्धन विभागाने १४ जुलै रोजीच्या शासन निर्णयाअन्वये पशुखाद्यात कॅल्शिअम, प्रोटीन, फायबर यासह असणाऱ्या २२ घटकांची माहिती बॅगवर नोंदविण्याचे सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात कंपन्यांची नोंदणी शासनाकडे झाली. मात्र अद्यापही बॅगवर घटक नोंदविले जात नाहीत. परिणामी, कंपन्या ४५ ते ५० रुपये किलो असा दर पशुखाद्यासाठी कसा आकारतात, हे स्पष्ट होत नाही, असे कुक्कुट समन्वय समितीचे सदस्य शरद गोडांबे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.