
Pune News : राज्यात महायुती सत्तेवर येऊन ११ दिवस होत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॅबिनेट बैठक घेतली. पण सत्ता येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ या अश्वासनाची महायुतीला विसर पडल्याचे दिसत आहे. पण महायुतीला त्यांचे आश्वासनाची आठवण काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी करवून दिली आहे. त्यांनी महायुतीसह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी, महायुती शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी देणार? असा सवाल केला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या दृष्टीने दोन निर्णय घेतले आहेत. एक मंगळवारी (ता.१०) निर्णय घेण्यात आला असून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. शासनाने राज्यातील २६ लाख ४८ हजार २४७ शेतकऱ्यांना २९२० कोटी ५७ लाख ५० हजार रूपये नुकसान भरपाई जाहीर केली. जून ते ऑक्टोंबर २०२४ च्या दरम्यान अतिवृष्टीमुळे २० लाख २४ हजार ६२०.९७ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते. तर दुसरा निर्णय सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणीस ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
दरम्यान वडेट्टीवार यांनी, फडणवीस यांच्यावर शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावरून जोरदार निशाना साधला आहे. वडेट्टीवार यांनी, राज्यात आता महायुतीचे सरकार आले असून काय झाले त्यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाचे? कधी देणार शेतकऱ्यांना कर्ज माफी? असा सवाल केला आहे.
सत्तेत येण्याआधी महायुतीवाले शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे वारंवार सांगत होते. तशी त्यांनी घोषणा केली होती. आश्वासन दिले होते. तर त्यांच्या जाहीरनाम्यातही तसे त्यांनी छापले होते. पण अद्याप महायुतीच्या नेत्यांनी आपले आश्वासन पाळलेले नाही, असा टोला वडेट्टीवार यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला आहे.
महायुतीवाल्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मुंबईत करावा अथवा नागपुरात करावा. त्यांनी विस्ताराची चिंता करत बसावे. आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. लोकांनी तुम्हाला बहुमत दिले असून आता सरकार महायुतीचे आले आहे. यामुळे आता सोयाबीनला, कापसाला भाव कधी देता ते सांगा? राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करता ये सांगा? शेतकऱ्याला कर्जमुक्त कधी करता याचे उत्तर सरकारने आता द्यावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
काय म्हटलं होतं फडणवीस यांनी?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फडणवीस यांनी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने राज्यात महायुतीचे सरकार आल्यास पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. हे शेतकऱ्यांचे सरकार असून आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणारे आहोत, असे म्हटले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.