Kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज नसते तर भारताचे संविधान झाले नसते. शिवरायांचे विचार घेऊनच काँग्रेस पक्ष लढा देत असल्याचे मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी व्यक्त केले.
कसबा बावडा येथील भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बहुशस्त्रधारी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
खासदार गांधी म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले आयुष्य ज्या कारणांसाठी खर्ची घातले, त्या विचारांसाठी आपण लढलो पाहिजे. महाराजांचे विचारांचे अनुकरण आपण करणार नसेल तर पुतळा उभारण्यात कोणताच उद्देश साध्य होणार नाही.
काँग्रेस पक्ष मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊनच पुढे जात आहे आणि यापुढेही चालणार आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे उपस्थित होते.