Sugar Industry : गाळप सुरू, उसाचा दर मात्र कळेना
Jalna News : अंबड घनसावंगी तालुक्यातील तीन साखर कारखाने तर एक गुळ पावडर युनिट असे चार कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केला आहे. मात्र, गाळप सुरू झालेल्या कोणत्याही कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर केलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांना आता ऊस दराची प्रतीक्षा आहे. कारखानदारांनी उसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
घनसावंगी व अंबड तालुक्यात कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना अंकुशनगर व युनिट क्रमांक दोन सागर ही साखर ही कारखाने माजी मंत्री राजेश टोपे यांची आहे. समृद्धी साखर कारखाना रेणुकानगर हा खासगी तत्वावरील साखर कारखाना भाजपचे नेते व नुकत्याच विधानसभेत अपक्ष निवडणुकीत उभे राहिलेले सतीश घाटगे यांचा कारखाना आहे.
तसेच ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग गूळ पावडर हा कारखाना नुकतेच आमदार झालेले डॉ. हिकमत उढाण यांचा आहे. या चार कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू होऊन २५ दिवसांचा कालावधी होत आहे. गेल्या वर्षी पाऊस नसल्याने या हंगामात ऊस क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्याचा गाळप हंगाम जास्त कालावधी जाण्याची शक्यता दिसत नाही.
साधारणतः नोव्हेंबरपासून ऊसगाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. अद्याप साखर कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कारखानदारांकडून दर जाहीर न केल्याने दराची कोंडी कायम आहे. तर दुसरीकडे तीन हजारांपेक्षा जास्त दर जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या मागणीतून कोणता कारखाना किती दर देणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कारखानानिहाय गाळप
२०२४-२५ मध्ये समर्थ कारखान्याचे युनिट नं.१ अंकुशनगर येथे २३ डिसेंबरअखेर कारखान्याने १ लाख ७२ हजार ५५० टन उसाचे गाळप होऊन त्यापासून १ लाख १ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ६.३८ टक्के आहे. डिस्टलरी प्रकल्पामध्ये ३२ लाख ५६ हजार ४४८ बल्क लिटर अल्कोहोल व ३२ लाख १५ हजार ९१६ बल्क लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे.
कारखान्याचे युनिट नं.२ (सागर) तीर्थपुरी येथे ८५ लाख ३१० टन उसाचे गाळप होऊन त्यापासून ६२ लाख ७८० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ८.०३ टक्के आला आहे. डिस्टलरी प्रकल्पामध्ये १९ लाख ८८ हजार ९९६ बल्क लिटर अल्कोहोल तर १५ लाख ७८ हजार ६५८ बल्क लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. समर्थ व सागर कारखाना साखर उत्पादनाबरोबर वीजनिर्मितीत १ कोटी ३ लाख ४ हजार युनिट वीजनिर्मितीचेही उत्पादनही झाले.
समृद्धी साखर कारखाना रेणुकानगर कारखान्याने १ लाख ६४ हजार ९०० टन उसाचे गाळप करत त्यापासून १ लाख १ हजार ५५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा १० टक्के आहे. वीजनिर्मिती ४६ लाख युनिट उत्पादनही घेत असल्याचे सांगण्यात आले. ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग गूळ पावडर युनिट यांच्याकडून ३२ हजार टन उसाचे गाळप झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.