Pune News : हमीभाव कायद्याच्या मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून १३ फेब्रूवारीपासून आंदोलन करत आहेत. आता ही लढाई आखलीन तीव्र झाली असून शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रणधूमाळीत रेल्वे गाड्या आडवल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी मालगाड्या आडकल्या आहेत. तर अनेक ठिकाणी रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलावा लागला आहे. तसेच अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. यादरम्यान या सुरू असणाऱ्या आंदोलनाचा फटका गोविंदगड थर्मल प्लांटला बसला असून येथे होणारा कोळसा पुरवठा बंद झाला आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आता थेट रेल्वे मार्ग आडवण्यास सुरूवात केली आहे. गेल्या महिन्यात या रेल्वे रोकोला सुरूवात झाली असून ते रविवारी (ता. ०५) १९ व्या दिवशी सुरू आहे. सहारनपूर-अंबाला रेल्वे सेक्शनसह शंभू रेल्वे स्टेशनवर दररोज अनेक रेल्वे गाड्या आडवल्या जात आहेत. यामुळे याचा फटका रेल्वेला बसत असून प्रवाशांचे हाल होत आहेत.
दरम्यान या आंदोलनामुळे कँट रेल्वे स्थानकावर धनबादहून गोविंदगडला जाणारी कोळशाने भरलेली मालगाडी गेल्या तीन दिवसांपासून थांबून आहे. यामुळे गोविंदगड थर्मल प्लांटला होणारा कोळसा पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. ही मालगाडी येथील पाच क्रमांकाच्या लाईनवर उभी आहे. येथे आंदोलनामुळे १४५ गाड्यांवर परिणाम झाला असून नवी दिल्ली आणि कटरा दरम्यान धावणारी २२४७७ वंदे भारत एक्सप्रेसला १७ तास उशीर झाला. असाच उशीर अमरनाथ एक्स्प्रेसला देखील झाला. ही गाडी २५ तास उशीरा पोहचली.
रेल्वे सुरक्षेत वाढ
दरम्यान चंदीगड-साहनेवाल रेल्वे सेक्शनची सुरक्षा वाढवण्यात आली असून अंबाला ते अमृतसर आणि कटरा या एकमेव रेल्वे विभागाच्या ५० किमी चंदिगड-साहनेवाल मार्गाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. येथे अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या एकेरी मार्गावरील गाड्यांचा ताण खूप वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान रेल्वे विभागाने सतत धावणाऱ्या गाड्यांमुळे ट्रॅकची दुरुस्ती करणे गरजेचे असून तसे न केल्यास अपघात होऊ शकतो, असा इशारा विभागाच्या देखभालीमध्ये गुंतलेल्या विभागाने दिला आहे. यामुळे रविवारी (ता.०५) संपूर्ण विभागावर दुपारी गाड्या थांबवून ट्रॅक तपासण्याचे काम सुरू होते.
हरियाणाचा पंजाबशी संपर्क तुटला
शंभू सीमेवर हजारो शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रॅक आडवल्याने हरियाणाचा पंजाबशी असलेला संपर्क तुटला आहे. येथील अंबाला-लुधियाना या मुख्य मार्गावरील शंभू रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळांवर आंदोलक शेतकऱ्यांनी पुन्हा आदोलन सुरू केले आहे. यादरम्यान हरियाणा आणि पंजाब सरकारच्या प्रतिनिधींनीही शेतकऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र ती निष्फळ ठरली आहे.
३४०० गाड्यां प्रभावित
अंबाला-लुधियाना रेल्वे स्टेशनवर शेतकऱ्यांच्या आंदोलाचा रविवारी १९ वा दिवस होता. अशा परिस्थितीत आतापर्यंत ३४०० अधिक गाड्या प्रभावित झाल्या. यामुळे रेल्वेच्या तोट्यात करोडोंची भर पडली आहे. तर अंबाला कँट रेल्वे स्थानकात १४५ गाड्या बाधित झाल्या. यामुळे ६४ गाड्या रद्द कराव्या लागल्या असून ८१ गाड्या पर्यायी मार्गाने मार्गस्थ कराव्या लागल्या आहेत.
अंबाला ते साहनेवाल मार्गे चंदीगडला जाणाऱ्या मालगाड्यांसह मेल आणि एक्स्प्रेस गाड्या तासनतास उशिरा धावत असल्याची माहिती अंबाला रेल्वे विभागाचे वरिष्ठ व्यावसायिक व्यवस्थापक नवीन कुमार यांनी दिली आहे. तसेच मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत सुधारणा करण्यासाठी मालगाड्यांचे संचालन काही काळासाठी बंद करण्यात आले आहे. तसेच रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त कर्मचारीही तैनात करण्यात आल्याचेही कुमार यांनी म्हटले आहे.
या गाड्या रद्द
शान-ए-पंजाब, पठाणकोट, फाजिल्का इंटरसिटी एक्स्प्रेस, अमृतसर इंटरसिटी एक्स्प्रेस, जम्मू मेल गाड्या अप आणि डाऊन मार्गावर रद्द करण्यात आल्या आहेत. तर आम्रपाली एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, माळवा, सचखंड एक्स्प्रेस आणि झेलम एक्स्प्रेसचे मार्ग वळवण्यात आली आहेत. या गाड्या जिंद आणि जाखल येथून लुधियाना मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.