
Mumbai News: देशातील सहकार क्षेत्रात याआधी महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होते. मात्र, सध्या गुजरात यामध्ये आघाडीवर आहे. राज्यात आजारी जिल्हा बँका आणि सूतगिरण्या, सहकारी साखर कारखान्यांचे वेगाने होणारे खासगीकरण ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्य सरकारने सहकारी संस्थांबाबतचे धोरण व कायदा बदलला पाहिजे. अन्यथा या संस्था इतिहासजमा होतील, अशी भीती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी (ता. १२) व्यक्त केली.
राज्य सरकारी बँकेच्या वतीने दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ या शतकोत्तर सुवर्ण स्मृती दिनानिमित्त आयोजित ‘सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण’ या परिसंवादात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सक्षम सहकारी संस्थांना स्वायत्तता देण्याची सूचना केली.
श्री. पवार म्हणाले, की महाराष्ट्रात किती सहकारी संस्था उभ्या राहिल्या याची आकडेवारी आहे. मात्र, तीन घटक महत्त्वाचे आहे. जिल्हा सहकारी बँका, साखर कारखाने आणि सूतगिरण्या यांमध्ये राज्याचे भागभांडवल आहे. सुरुवातीला कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांची गुंतवणूक सात ते आठ लाखांची असायची. सरकार भागभांडवल द्यायचे. राज्य बँक अर्थसाहाय्य करत होते. मात्र, नीट विचार केला तर जेवढ्या जिल्हा बँका आहेत त्यातील बहुतांश बँका आजारी आहेत. साखर कारखानदारी महाराष्ट्रातून देशात गेली.
यशवंतराव चव्हाण, धनंजयराव गाडगीड, वसंतदादा पाटील यांच्या काळात या एक प्रकारचे स्थैर्य होते. आज सगळे कारखाने पाहिले तर काय दिसते? पूर्वी ८० टक्के सहकारी आणि २० टक्के खासगी साखर कारखाने असे चित्र होते. आज खासगी कारखान्यांची संख्या ५० टक्क्यांवर गेली आहे. महाराष्ट्रात दोन किंवा तीन सूतगिरण्या कशाबशा चालल्या आहेत. सहकाराचे सक्षमीकरण जेव्हा सांगतो तेव्हा या सगळ्याचा विचार करायचा की नाही? असा सवालही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, की सरकारने यासाठी समिती नेमली पाहिजे. साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा बँकांचा सखोल अभ्यास करा. असे का घडते याचा अभ्यास करून ते दुरुस्त करा. संस्था सक्षमीकरणासाठी धोरण, कायद्यात बदल करण्याची वेळ आली आहे.
‘बँक सुस्थितीत’
श्री. पवार पुढे म्हणाले, ‘‘धनंजयराव गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, वसंतदादा पाटील, अजित पवार यांनी राज्य बँकेचे नेतृत्व केले. या सर्वांच्या कालखंडात शक्तिशाली बँक म्हणून गणली जात होती. मध्यंतरी तिची अवस्था इतकी वाईट झाली. त्यामुळे अस्वस्थता होती. विद्याधर अनास्कर यांनी कष्ट करून ऊर्जितावस्थेला आणण्याचे काम त्यांनी केले आहे. आजची आकडेवारी स्वच्छ सांगत आहे की ही बँक सावरली आहे. अनास्कर यांनी केलेले काम राज्य बँकेपुरते सीमित ठेवू नका. सहकारी संस्थांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी त्यांची गरज आहे.
चांगल्या संस्थांना स्वायत्ता द्या : गडकरी
शिक्षण क्षेत्रात ज्याप्रमाणे चांगल्या सक्षम शिक्षण संस्थांना सरकारने स्वायत्तता दिली आहे. त्याचप्रमाणे सहकारातही चांगल्या सक्षम संस्थांना स्वायत्तता द्यावी, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ते म्हणाले, ‘‘फक्त चांगला कारभार नसलेल्या संस्थांवरच राज्य सरकारने नियंत्रण ठेवावे.
सध्या सहकार चळवळ देशात केवळ महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ आणि इतर काही राज्यांमध्ये आहे. ही चळवळ देशभर रुजविण्यासाठी केंद्राने नवीन सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. राज्यात सध्या अस्तित्वात असले कंपनी कायदा, सहकार कायदा यांचा सुवर्णमध्य साधून एक नवीन कायदा आणावा.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.