
Cattle Farming : जगभरातील एक अब्जापेक्षा अधिक गाईंना या शतकाच्या अखेरपर्यंत उष्णतेचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागणार असल्याचे नव्या संशोधनातून पुढे आले आहे. येत्या काळामध्ये उष्ण कटिबंधीय देशांमध्ये गोपालनातील समस्या वाढत जाणार आहेत. मात्र कार्बन आणि हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी वेळीच प्रयत्न केले, तर हा परिणाम ५० ते ८४ टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य असल्याचे निष्कर्ष ‘आयओपी’ प्रकाशित ‘जर्नल इन्व्हायर्न्मेंटल रिसर्च लेटर्स’मध्ये मांडण्यात आले आहेत.
केपटाउन विद्यापीठ, क्वाझुलू नॅटल विद्यापीठ आणि शिकागो विद्यापीठ येथील संशोधकांनी वाढत्या उष्णतेच्या ताणांचे गाईंवरील सध्या होत असलेले आणि संभाव्य परिणामांचा अभ्यास केला आहे. त्यासाठी जगभरातील विविध ठिकाणी असलेली उष्णता आणि आर्द्रता, हरितगृह वायूच्या उत्सर्जनाचे यांचे सध्याचे प्रमाण आणि येत्या काही दशकांमधील संभाव्य वाढीची माहिती वापरली. या अभ्यासातील निष्कर्षानुसार,मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा काही भाग, आफ्रिकेचा काही भाग, दक्षिण आणि आग्नेय आशिया या विविध प्रदेशामधील गोपालन व्यवसायावर उष्णतेच्या ताणाचे संकट घोंघावत आहे.
त्यावर मात करण्यासाठी हरितगृह वायूचे उत्सर्जन वेगाने कमी करावे लागेल. त्याच प्रमाणे गाईंची संख्या सध्याच्या पातळीवर कायम राहिल्यास हा उष्णतेचा परिणाम काही प्रमाणात कमी करणे शक्य आहे. हे प्रमाण आशियामध्ये किमान ५० टक्के, दक्षिण अमेरिकेमध्ये ६३ टक्के आणि आफ्रिकेमध्ये ८४ टक्के कमी करणे शक्य असल्याचेही निष्कर्ष त्यांनी काढले आहेत.
जर सध्याच्या वाढीच्या दराप्रमाणे कर्बवायूचे उत्सर्जन वाढत गेले तर त्यामुळे वाढलेल्या उष्णतेचा ताण जगभरातील १० पैकी ९ गाईंना वर्षातील तीस किंवा त्याहीपेक्षा अधिक दिवसांसाठी सहन करावा लागेल. तर या शतकाच्या अखेरपर्यंत हेच प्रमाण वाढून १० पैकी ३ गाईंना संपूर्ण वर्षाचा काळ उष्णतेच्या ताणामध्ये घालवावा लागेल. त्यातही सर्वाधिक फटका उष्ण कटिबंधातील देशांना सर्वाधिक बसेल. त्याच वेळी युरोप आणि उत्तर अमेरिकेसारख्या अन्य काही प्रदेशामध्ये प्रत्येक वर्षी उष्णतेच्या कालावधीमध्ये, पर्यायाने ताणामध्ये काही महिन्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. जपान, ऑस्ट्रेलिया आणि मेक्सिकोसारख्या देशामधील काही भागांमध्ये १८० किंवा त्याहीपेक्षा अधिक उष्णतेच्या ताणाचे दिवस प्रति वर्ष राहण्याची शक्यता आहे.
याविषयी अधिक माहिती देताना क्वाझुलू नॅटल विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. मिचेल नॉर्थ यांनी सांगितले, की आमच्या अभ्यासामध्ये गाई या वाढत्या तापमानाला सामोऱ्या जात असून, त्याचा त्यांच्या कल्याण, वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. जगाच्या विविध भागांमध्ये त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. या अभ्यासात फक्त उष्णतेच्या ताणाचा विचार केलेला आहे. वाढलेल्या उष्णतेमध्ये पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार आहे, त्याचा विचार केलेला नाही. पण याचा एक अर्थ असाच आहे, की जगभरातील अनेक प्रदेशामध्ये गोपालन हे परवडण्याच्या स्थितीमध्ये राहण्याची शक्यताच कमी- कमी होत जाणार आहे.
उष्णतेच्या ताणासोबतच अधिक आर्द्रता असल्यास गाईवर होणारे परिणाम
- गाईंची पुनरुत्पादन क्षमता घटते.
- कालवडीच्या वाढीवर परिणाम होतो.
- गाईंच्या मृत्यूंचे प्रमाण वाढते.
- दुधाळ गायींच्या दूध उत्पादनामध्ये घट होते.
या गोष्टींचा एकत्रित विचार केल्यास एकूण पशुपालन हे आर्थिकदृष्ट्या परवडण्यापलीकडे जाते. पशुकल्याणाचा विचार मागे पडतो. तसेच या कृषी पूरक व्यवसायामधील उत्पन्नांमध्ये घट होऊ शकते.
उपाययोजना
केपटाउन विद्यापीठातील पर्यावरण तज्ज्ञ डॉ. ख्रिस्तोफर ट्रायसोस यांनी सांगितले, की वातावरणाशी संबंधित घटकांमध्ये मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढत आहे. आपल्या आहारामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या गाई या उष्णतेमध्ये धोक्यात येत आहेत. आपण हा धोका कमी करण्यासाठी तातडीने कृती करण्याची गरज आहे.
वाढणारे तापमान आणि आर्द्रता यांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना तयार राहावे लागेल. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांकडे वळण्याशिवाय त्यांच्याकडे गत्यंतर राहणार नाही.
-गाईंसाठी बांधलेल्या गोठ्यांचे आरेखन योग्य प्रकारे बदलण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये हवा खेळती राहण्याची सोय करावी लागेल. फारच तीव्र वातावरणाच्या प्रदेशामध्ये गायींचे शरीर थंड राहण्यासाठी एअर कूलरचा वापर करावा लागेल किंवा नव्या उष्णतेला सहनशील अशा गायींच्या जातींची पैदास करावी लागेल. सध्या भारत, ब्राझील, पॅराग्वे, उरुग्वे आणि ईशान्य अर्जेंटिना या बरोबरच सहेलियन आणि पूर्व आफ्रिकेतील काही देशातील मोठा वर्ग पशुपालनावरच अवलंबून आहे. या देशामध्ये नव्याने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा खर्च सामान्य शेतकऱ्यांना कितपत परवडेल, याबाबतही संशोधनामध्ये शंका व्यक्त करण्यात आली आहे.
-कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण वेगाने कमी करतानाच जनावरांची संख्या सध्याच्या पातळीवर मर्यादित ठेवली तरी उष्णतेचा ताण किमान पातळीवर राखणे शक्य होईल. विशेषतः आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील प्रदेशांचा याचा फायदा होईल. तसेच सध्या वर्षाच्या अर्ध्या कालावधीमध्ये उष्णतेचा सामना कराव्या लागणाऱ्या शीत प्रदेशामध्येही याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य दशकाच्या पशुपालनासाठी आज आपण घेत व घेतले जाणारे निर्णय अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत.
- पशुपालनासाठी जंगलांचे प्रमाण कमी करून चालणार नाही. ते अनेक अर्थाने हानिकारक ठरत जाणार आहे. उदा. अॅमेझॉन आणि मध्य आफ्रिकेतील जंगले कापून होणारी शेती किंवा पशुपालन इ.
- स्थानिक, देशी जातींच्या गाईंवरील नेमक्या परिणामांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्यातून आपल्याला उष्णता आणि बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या गाई आपल्या गोठ्यात आणण्यावर भर दिला पाहिजे.
- आहारातील बीफ (गोमांस) कमी करून त्याऐवजी वनस्पतिजन्य पदार्थांचे प्रमाण वाढवणे हे मानवी शरीराच्या आरोग्यासोबतच पर्यावरणासाठीही तितकेच फायद्याचे ठरणार आहे.
हरितगृह वायू उत्सर्जन आणि जनावरांवरील वाढत्या तापमानाचा ताण हे दोन्ही कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सध्या पशुपालक असलेल्या शेतकऱ्यांनी व शासनाने आतापासूनच त्या दिशेने धोरणे आखून उपाययोजनांना सुरुवात करायला हवी. स्थानिक बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या गाईंच्या जातींचा सांभाळ आणि त्यातील सुधारणा या दिशेने आतापासूनच प्रयत्न करावे लागतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.