Nashik News : पाटबंधारे विभागाने पालखेड डाव्या कालव्याला सोडलेल्या आवर्तनातून शेतकऱ्यांना वितरिका क्रमांक २८ वरील पोटवितरिका फोडून पाणी सोडल्याबद्दल भाजप नेत्या व प्रचार प्रमुख अमृता पवार यांच्यावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल महिन्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामागे राजकीय दबावाची चर्चा सुरू आहे.
अवर्षणप्रवण तालुका असल्याने पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावर तालुक्यातील रब्बी हंगाम अवलंबून असतो. यंदा पाऊस कमी झाल्याने या आवर्तनाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी रब्बीची पिके व कांदा लागवड केली आहे. त्यातच नोंदणी करूनही पाणी मिळत नसल्याने विविध भागांतील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.
पालखेड कालव्यावरील चारी क्रमांक २५ आणि २८ येथे शेतकऱ्यांवर पाणी देण्यात अन्याय होत असल्याने या चारी भाजपच्या अमृता पवार व समर्थकांनी फोडल्या अन् शेतकऱ्यांना पाणी मिळावून दिले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे पवार समर्थकांनी म्हटले आहे.
मुखेड परिसरातील अनेक शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्याचा आरोप करत पवार यांनी महिनाभरापूर्वी आंदोलनाची भूमिका घेत पाणी सोडले होते. पोलिसांनी शनिवारी (ता. १७) पवार यांना यासंदर्भात नोटीस बजावली.पवार येथील भाजप नेते व समर्थकांसह तालुका पोलिस ठाण्यात आल्या होत्या. यावेळी नोटीस स्वीकारत त्यांनी आपण कोणतीही चूक केली नसल्याचे माध्यमासमोर सांगितले.
पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी हक्काचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले. रीतसर मागणी नोंदवली आहे. तरीही पाणी मिळत नाही. पीक करपताना पाहवत नसल्याने शेतीला पाणी मिळावे म्हणून आपण प्रयत्न केले. याचा राग संबंधितांना तब्बल महिना उलटून गेल्यानंतर आला. त्यांनी माझ्यासह दोन शेतकरी महिलांनाही या गुन्ह्यात अडकवले आहे, असे या वेळी पवार म्हणाल्या.
जानेवारी महिन्यात पाटबंधारे विभागाने येवला तालुक्यासाठी पालखेड धरणाच्या चाऱ्यांना पिण्यासाठी पाणी सोडले, मात्र असे करताना दुजाभाव होत असल्याने ग्रामस्थ संतापले. अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी आधी मागणी नोंदवून आणि शुल्क भरूनही त्यांना पाणी मिळाले नाही, पालखेड कालवा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
लाख गुन्हे दखल झाले तरी; संघर्ष करणारच
पवार म्हणाल्या, की यासंदर्भात गेले महिनाभर पाटबंधारे विभागावर राजकीय दबाव होता अधिकारी प्रचंड दडपणाखाली होते. या दडपणातूनच त्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एक महिन्यापूर्वी घडला, मात्र गुन्हे आत्ता दाखल करण्यात आले.
यावरून यामागे असलेले राजकीय षडयंत्र स्पष्ट होते. यात कोणता राजकीय नेता दबाव आणत असावा, हे सर्वश्रुत आहे. मात्र असे लाख गुन्हे दाखल झाले तरीही, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि पाण्यासाठी कितीही झगडावे लागले तरीही मी झगडतच राहील.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.