
डॉ. गणेश पवार
जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश म्हणून भारत देश ओळखला जातो. जागतिक साखर उत्पादनाच्या १६ ते १८ टक्के साखर उत्पादन भारत देशात होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार प्रतिदिन प्राप्त केलेल्या एकूण ऊर्जेपैकी ५ टक्के पेक्षा जास्त ऊर्जा ही साखरेद्वारा प्राप्त केलेली असू नये. आरोग्याचा विचार करता साखरेचे सेवन ११ ग्रॅम प्रतिमाणशी प्रति दिवस इतके असावे.
एका दिवसात २५ ग्रॅम पेक्षा जास्त साखरेचे सेवन करू नये असे मानक निर्धारित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार प्रतिदिन प्राप्त केलेल्या एकूण ऊर्जेपैकी ५ टक्के पेक्षा जास्त ऊर्जा ही साखरेद्वारा प्राप्त केलेली असू नये. आरोग्याचा विचार करता साखरेचे सेवन ११ ग्रॅम प्रतिमाणशी प्रति दिवस इतके असावे. एका दिवसात २५ ग्रॅम पेक्षा जास्त साखरेचे सेवन करू नये असे मानक निर्धारित करण्यात आले आहे.
इतर उपपदार्थ व आधारित उद्योग अल्कोहोल व मळी (मोलॅसिस)
भारतात निर्माण होणाऱ्या अल्कोहोल पैकी ६० टक्के अल्कोहोल हे औद्योगिक क्षेत्रात, तर ४० टक्के अल्कोहोल हे मद्य निर्मितीसाठी वापरले जाते. वर्ष २०११ मध्ये देशांमध्ये सुमारे ३२८ आसवण्यातून २.३ अब्ज लिटर अल्कोहोल निर्मितीसाठी होत होती. २०१८-१९ दरम्यान मळीवर आधारित आसवणी प्रकल्पाची क्षमता ४.२० अब्ज लिटर होती.
मळीपासून इथेनॉल निर्मिती देखील केली जाते. मळी हा राज्य सूचीतील विषय आहे. अल्कोहोल निर्मितीत भारत हा जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर येतो. महाराष्ट्रात २०१९-२० या काळात साखर उद्योगावर आधारित ८१ आसवणी प्रकल्प कार्यरत होते. मळीमध्ये ३० ते ३५ टक्के साखर व १५ ते २० टक्के रिड्युसिंग शुगर असते. त्यामुळे या मळीपासून इथिल अल्कोहोल, सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, पशुखाद्य, यीस्ट, लायसिन, सिटोन ब्युटेनॉल अल्कोहोल तयार केले जाते.
याशिवाय अल्कोहोल हा मुख्य घटक असलेली रसायने जसे की, ॲसिटिक ॲसिड ॲसिटिक अनहायड्रॉइड, ॲसिटोन, इथिल ॲसिटेट, इथिल बेंझिन, ॲस्टीरिन पॉलिस्टरिन, पॉलिइथिलिन व कृत्रिम रबर या प्रकारची उपउत्पादने उसाच्या मळीचा वापर करून केली जातात. इथिल अल्कोहोलचा वापर करून अनेक विविध प्रकारची मद्य तयार केली जातात.
सायट्रिक ॲसिड हे व्यापारी साखरेचा वापर करून तयार करणे आर्थिकदृष्ट्या महागात पडते. परंतु मळीपासून सायट्रिक ॲसिड कमी खर्चात तयार करण्यास प्राधान्य दिले जाते. याच सायट्रिक ॲसिडचा वापर जाम, फळांचे रस, अनेक खाद्यपदार्थ उत्पादन व कन्फेक्शनरी तयार करण्यासाठी करतात.
इथेनॉल निर्मिती
भारताने राष्ट्रीय जैव इंधन धोरण २०१८ अंतर्गत इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम (EBP) आखला असून २०२३ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे धोरण ठरवले आहे. त्यानुसार २०२५ पर्यंत ईबीपी २० टक्के चे उद्दिष्ट गाठण्याचे निश्चित केले आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, हरियाना व कर्नाटक या राज्यांनी १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट २०२१ मध्ये पूर्ण केले आहे. ब्राझीलच्या बायोप्युएल पॉलिसी २०१८ च्या धोरणाचे भारताने अनुकरण करून आपले धोरण निश्चित केले आहे. बायोप्युएल पॉलिसी २०१८ अंतर्गत केंद्र शासनाने ज्या कच्च्या मालापासून इथेनॉल तयार होते, त्यानुसार तेल कंपन्यांकडून खरेदी किंमत २०२३-२४ वर्षाकरिता खालील प्रमाणे निश्चित केली आहे.
मागील दशकात प्रत्येक साखर हंगामाच्या सुरुवातीस शिल्लक राहणारे साखरेचे साठे व त्यात गुंतून पडणारा निधी यामुळे दरवर्षी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी कारखान्यास दिलेल्या उसापोटी द्यायची ‘एफआरपी’ची मोठी रक्कम थकीत राहत होती. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देणे ही मोठी समस्या भारतीय साखर उद्योगा पुढे तयार झाली आहे. परंतु या शिल्लक साठ्यांना इथेनॉल निर्मितीकडे वळवून व साखरेची निर्यात करून मिळणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी देणे शक्य झाले आहे.
२०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रण धोरण पूर्ण करण्यासाठी इथेनॉल क्षमतेत वाढ करावी लागेल. याबाबत असलेली क्षमता व संभाव्य क्षमता याचा आढावा पुढील तक्त्यात दिला आहे.
ईबीपी २० टक्के कार्यक्रम २०२५ पर्यंत देशभरात अमलात आणून देशात पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये बदल करावा लागणार आहे. पंतप्रधानांनी ६ जून २०२१ रोजी केलेल्या घोषणेनुसार २०२३ पासून नव्या वाहनांना E२० टक्के मिश्रण पूरक वाहनांचे मानके पाळावी लागणार आहेत. त्यानुसार दरवर्षी ८ टक्के नवी वाहणे जुन्या वाहनांची जागा घेतील. त्यामुळे २०२५ या वर्षात २५ टक्के वाहने ही E२० टक्के मानकांची पालन करणारी असतील, तर उर्वरित ७५ टक्के वाहने ही E१० टक्के मानकाची पालन करणारी असतील. फ्लेक्स फ्युएल वाहनांच्या (FFV) निर्मितीमुळे वाहतूक व दळणवळण क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्यास चालना मिळेल. येत्या दहा वर्षांमध्ये हायब्रीड कार, फ्लेक्स फ्युएल व पूर्णतः विद्युत बॅटरीवर चालणारी वाहने ही पारंपरिक पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची जागा घेतील.
कृषी मालाची निर्यात
भारताची कृषी व कृषिपूरक प्रमुख वस्तूंची निर्यात व त्यातील साखरेचे महत्त्व पुढील कृषी वस्तूंची निर्यात तुलना तक्त्यावरून लक्षात येईल. यामध्ये २०२०-२१ मध्ये ७४.६० लाख टन साखर आणि त्यामुळे २००८८ कोटी रुपयांची साखर निर्यात करण्यात आली.
साखरेचा जागतिक खप
भारत हा ब्राझील पाठोपाठ साखर उत्पादन करणारा जगातील मोठा देश आहे. तसेच जगातील सर्वात जास्त साखरेचा वापर करणारा देखील देश भारत आहे. भारतात दरवर्षी सुमारे ३१.०० दशलक्ष टन इतक्या प्रचंड प्रमाणात साखरेचा खप होतो. भारतापाठोपाठ युरोपीय महासंघ (१६.८० दशलक्ष टन), चीन ( १५.६० दशलक्ष टन) खप होणारे देश आहेत.
- डॉ. गणेश पवार, ९६६५९६२६१७ (लेखक ऊस पिकाचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.