
Buldana News : हा जिल्हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम आहे. जिल्ह्यातील कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील विकासातून जिल्ह्याची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीत जिल्हा आता थांबणार नाही. यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले
देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानात पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा झाला. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या परिश्रमामुळे गेल्या हंगामात जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता देशाच्या सरासरीपेक्षा अधिक राहिली आहे.
बदलत्या वातावरणामुळे शेतीवर होणाऱ्या विपरित परिणामावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. ही गरज ओळखून जिल्ह्यात या चालू वर्षात १४ हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा, मोसंबी, सीताफळ, केळी, पेरू, आंबा या फळपिकांची लागवड करण्यात आली आहे.
सेंद्रिय शेतीचे क्षेत्रही वाढत असून ते आता आठ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. आगामी काळात भाजीपाला, तेलबिया आणि बियाणे उत्पादन केंद्र विकसित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच बियाणे उत्पादनात शेतकऱ्यांनी दिलेल्या योगदानामुळे सोयाबीन बियाण्यांच्या उत्पादनात जिल्हा अव्वल राहिला आहे.’’
शेतकऱ्यांना ८१५ कोटींची मदत
मागील खरीप हंगामावर अतिवृष्टीमुळे काही तालुक्यातील पिकांवर संकट आले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात आले. पीकविमा योजनेअंतर्गत २०२३-२४ मध्ये खरीप व रब्बी हंगामातील ४९७ कोटींची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
अवेळी पाऊस, अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळ बाधित नऊ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत ८१५ कोटींची नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात आली आहे. या मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी शासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रकल्पांचा ३०० गावांना लाभ
जिल्ह्यात जिगांव, राहेरा, आलेवाडी हे प्रमुख सिंचन प्रकल्प होत आहेत. जिगांव प्रकल्पातून सव्वा लाख हेक्टर क्षेत्रापैकी माहे जूनपर्यंत १० हजार हेक्टर, राहेरा लघू सिंचन प्रकल्पातून मार्चपर्यंत ४६५ हेक्टर तर आलेवाडी लघू सिंचन प्रकल्पातून जूनपर्यंत ७५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जिगाव, राहेरा, आलेवाडी या तीनही सिंचन प्रकल्पाचा तीनशे गावांना लाभ होणार आहे. नदीजोडद्वारे ३८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी व श्री. मोरे यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.