Beed News
Beed NewsAgrowon

Beed News : महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला मागितली २ लाखांची लाच; तक्रार करूनही कारवाई नाहीच

खांब उभारून गुत्तेदारांचे उखळ पांढरे करण्याचा दोन अभियंत्याचा डाव होता. याबाबत फड यांनी चौकशी केली. त्यावेळी महावितरणचे कनिष्ठ अभियंता सतीश गुडे आणि वरिष्ठ अभियंता कानडे यांनी २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप फड यांनी केला.

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी श्रीकर त्रिंबकराव फड (पुसे, ता. आंबेजोगाई) यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. फड यांच्या शेतातून विद्युत वाहक तारा जमिनीच्या आतून टाकण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु तरीही महावितरणच्या दोन अभियंत्यांनी कर्मचाऱ्यांना खांबावरुन तारांची जोडणी करण्यास सांगितले.

खांब उभारून गुत्तेदारांचे उखळ पांढरे करण्याचा दोन अभियंत्याचा डाव होता. याबाबत फड यांनी चौकशी केली. त्यावेळी महावितरणचे कनिष्ठ अभियंता सतीश गुडे आणि वरिष्ठ अभियंता कानडे यांनी २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप फड यांनी केला. या प्रकरणी फड यांनी २३ मे २०२३ रोजी बीड येथील महावितरणच्या वारिष्ठांकडे लेखी तक्रार केली. परंतु अजूनही अधिकाऱ्यांवर तक्रार करण्यात आली नसल्याचं फड यांनी सांगितलं.

प्रकरण काय?

श्रीकर फड यांची पुस गावात गट क्रमांक ४८३ मध्ये शेतजमीन आहे. शेताच्या जवळच रस्ता आहे. या रस्त्याचे बाजूला ३३ केव्ही उपकेंद्राचं स्थलांतर करण्यात आलं. त्यासाठी नियमानुसार महावितरणला ४ लाख रुपये देण्यात आले आहेत. या उपकेंद्रावरील केबल जमिनीच्या आतून घेण्यासाठी महावितरणनं परवानगी दिली होती. परंतु ऐनवेळेला खांब उभारून शेतकऱ्यांची कोंडी केली. आणि त्याबद्दल चौकशी केली असता जमिनीच्या आतून केबल टाकण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप फड यांनी केलाय.

कारवाईला उशीर का?

फड यांनी दोन अभियंत्याची संभाजी नगरचे संयुक्त प्रबंध निदेशक, मुख्य अभियंता लातूर, अधीक्षक अभियंता बीड आणि ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर दोन्ही अभियंत्याची चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. समितीने चौकशीत दोन्ही अभियंत्यांनी पदाचा गैरवापर केल्याचं सांगितलं. परंतु तरीही दोन्ही अभियंत्यावर कसलीही कारवाई करण्यात आली नाही.

राज्यात महावितरण कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना जाच सहन करावा लागतो. वीज बिल वसूलीसाठी सक्ती केली जाते. तर अनेकदा पीकाला पाण्याची गरज असतानाच वीज पुरवठा खंडित केला जातो, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

Electricity Bill
Electricity BillAgrowon

दरम्यान, आंबेजोगाई तालुक्यातील गिरवली येथील २२० केव्ही केंद्रावरून घाटनांदुर ३३ केव्ही केंद्रावर वीज पुरवठा तारांना पन्नास वर्ष पूर्ण झालीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अपघाताची भीती वाटते. त्यामुळे १५ डिसेंबर २०२३ रोजी महावितरणच्या विभागीय कार्यकारी अभियंत्याकडे ११ शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली होती. आणि त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com