
जामली, जि. अमरावती : बहीणभावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण दोन दिवसांवर आला आहे. राख्यांची (Rakhi) खरेदी-विक्री सुरू झाली आहे. प्रत्येक राखीपैर्णिमेला (Bamboo Rakhi) भावाला काहीतरी वेगळी राखी बांधायची, अशी बहिणीची इच्छा असते. अशातच नैसर्गिक साधनांपासून बनवलेल्या बांबूराखीला मेळघाटातच नव्हे, तर ६० देशांतही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. आतापर्यंत ६० हजार राख्या जपान, अमेरिकेसह ६० देशांत पोहोचविण्यात आल्या आहेत.
सुनील देशपांडे यांनी १९९७ साली संपूर्ण बांबू केंद्राची स्थापना केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉ. निरुपमा देशपांडे हे कार्य सांभाळत आहेत. २०१८ साली मेळघाटातील बांबूपासून बनवलेली राखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधली होती. त्यानंतर मिळालेली प्रसिद्धी आणि आयसीएआर यांच्या सहयोगाने विदेशातही राखी पाठविण्याचा कार्यक्रम सुरू झाला.
बांबू केंद्राच्या संचालक डॉ. निरुपमा देशपांडे म्हणाल्या, ‘‘ऑनलाइन राख्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. नागपुरातही लोक जास्तीत जास्त ऑनलाइन राख्या मागवीत आहेत.’’
फोटो राखीला विशेष पसंती
भावाच्या फोटोवाली राखीचे चलन मागील दोन वर्षांपासून सुरू झाले आहे. गुजरात व मुंबईला या राख्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. यात लहान मुलांनाच नाही, तर मोठ्या लोकांनासुद्धा फोटोवाली राख्या पसंत पडत आहेत. शहरात जवळपास सर्वच फोटो स्टुडिओमध्ये या राख्या मिळत आहेत. सीझनमध्ये ४०० पेक्षा जास्त राख्या एका स्टुडिओमध्ये बनविल्या जातात.
महिलांना मिळाला रोजगार
मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी गावांतील महिला राख्या बनविण्याचे काम करतात. आता त्यांना बाराही महिने राख्या बनविण्याचे काम दिले जात आहे. त्यात त्यांना बऱ्यापैकी रोजगार मिळत आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक राख्या बनवून बाजारात विक्रीसाठी पाठविल्या आहेत. लोकांचा प्रतिसाद पाहता शाळकरी मुलांसाठी राखी बनविण्याची किट तयार केल्या आहेत. त्यांनाही राखी बनविणे शिकविले जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.