
जन्मापासून २० वर्षांपर्यंतचा टप्पा महत्त्वाचा असतो, कारण हा कालावधी शरीराच्या वाढीचा असतो. याच कालावधीत माणसाचा शारीरिक आणि मानसिक विकास (Mental Development) होतो. त्यामुळे या वयात आहाराद्वारे (Diet) ऊर्जा मिळणे अत्यंत आवश्यक असते. मेंदूच्या विकासासाठी प्रथिने (Protein), उपयुक्त फॅटी अॅसिड्स, कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, झिंक आदींनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा बालकांच्या आणि नवयुवकांच्या आहारात समावेश करावा. विविध भाज्यांचा (Vegetables) वापर करून सँडविच, रोल्स, पराठे, थालीपीठ आदींच्या माध्यमातून त्यांना पौष्टिक पदार्थ द्यावेत.
विशी ते चाळिशीतील व्यक्तींसाठी आहार ः
१) या वयात माणूस सर्वाधिक कार्यक्षम असतो. उच्च शिक्षण, करियरच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्याची बरीच शारीरिक आणि मानसिक ऊर्जा खर्च होत असते. त्यामुळे या वयातल्या व्यक्तींनी आरोग्याच्या दृष्टीने योग्य अन्नपदार्थांचे सेवन केले पाहिजे.
२) पुरुषांना अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे अधिक ऊर्जादायी अन्नपदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश हवा. महिलांना लोहाची गरज जास्त असते. या वयातल्या महिलांनी प्रथिने, फॅटी अॅसिड्स, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह आणि फॉलिक अॅसिड आदींनी समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे.
३) या वयात मेटाबॉलिक चेजेंस होत असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्त्वांची गरज बदलत जाते. या वयात हेल्दी फॅट्सचा आहारात समावेश हवा. पचनक्षमता, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी फायटो न्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सिडंट्स आदींचा समावेश असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश असला पाहिजे.
४) वाढत्या वयानुसार हाडं ठिसूळ होणं, उच्च रक्तदाब, हृदयरोग, डायबेटीस आदी विकार होऊ शकतात. म्हणून संतुलित आहाराची सर्वाधिक गरज या वयोगटाला असते. अशा व्यक्तींच्या आहारात नट्स, पालक, फळे आदींचा आहारात अवश्य समावेश असावा.
ज्येष्ठांचा आहार ः
१) आपल्याकडे नोकरीतून निवृत्त होण्याची वयोमर्यादा साधारण ५८ ते ६० वर्षांची आहे. कारण त्या वयानंतर शरीराची क्षमता कमी होत जाते. पचनक्षमतेवरही परिणाम होतो. वयाच्या या टप्प्यात शरीराला सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासू शकते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायू दुखावू शकतात, हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते.
२) या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जीवनसत्त्व ड, कॅल्शिअम, प्रथिनांचा आहारात समावेश असणे वयाच्या या टप्प्यात महत्त्वाचे ठरते. यासाठी आहारात सूप, डाळी, कडधान्ये, भाजीपाला आदींचा आहारात समावेश असावा.
३) शरीराचे पोषण हा शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. आपण वेगवेगळे पदार्थ खातो, त्यात आपल्या जिभेला तृप्त करणं आणि पोट भरणे हा हेतू असतातच; पण शरीराचे पोषण हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. शरीराचे पोषण चांगलं होणं हे आपण घेत असलेल्या आहारावर अवलंबून असते. पोषणातूनच आपल्याला ऊर्जा मिळते, आपली कार्यक्षमता वाढते आणि टिकून राहते, तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
४) आपण जे काही खातो, त्यावर आपलं आरोग्य अवलंबून असते. चांगलं, पौष्टिक खाल्ले, तरच प्रकृती सुदृढ राहते. कोरोनाच्या कालखंडात तर पोषणाचे अधिकच महत्त्व कळले आहे.
प्रत्येकाने पालेभाज्या आणि फळ भाज्यांची परसबाग विकसित करावी. ज्यामुळे घरच्या घरी भाज्यांच्या उत्पादनामुळे लोह आणि जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता भरून काढता येईल.
---------------------------------------------------------------
डॉ, साधना उमरीकर, ९४२०५३००६७
( विषय विशेषज्ञ (गृह विज्ञान), कृषी विज्ञान केंद्र , बदनापूर,जि.जालना)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.