डॉ. सचिन मांडवगणे‘बजरंग बाण’ या बायोकल्चर तंत्रज्ञानामुळे कृषी अवशेषांचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करण्याचा वेळ, पैसा व मजुरीची बचत होते. रासायनिक खतांची गरज कमी होते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. जमिनीचे आरोग्य टिकून राहते. पीक अवशेष जाळण्याची गरज संपते, हवेतील प्रदूषण कमी होते आणि कचऱ्याचा पुनर्वापर होतो. हे बायोकल्चर ‘कचऱ्यापासून समृद्धीकडे’ या संकल्पनेला चालना देणारी आहे..शेतकऱ्यांच्या समोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे पीक काढणीनंतर उरलेले पेंढा, ऊस पाचट, पऱ्हाटीचे अवशेष यांसारखे कठीण कृषी अवशेष. हे सहज विघटित होत नाहीत. त्यांचा ढीग साचल्याने शेतकरी शेवटी त्यांना जाळून टाकतात. परिणामी सेंद्रिय घटकांचा अपव्यय होतो, हवेचे प्रदूषण वाढते. या समस्येवर शास्त्रीय उपाय म्हणून ‘बजरंग बाण’ हे बायोकल्चर विकसित करण्यात आले आहे. या बायोकल्चर तंत्रज्ञानाच्या मदतीने भाताचा पेंढा, कपाशी पऱ्हाट्या खुंट्या, ऊस पाचट यांसारखे कठीण अवशेषही फक्त २० ते २५ दिवसांत पोषक तत्त्वांनी युक्त कंपोस्टमध्ये रूपांतरित होतात. .Compost Fertilizer: नासधूस झालेल्या पिकांपासून बनवा उत्तम कंपोस्ट; कमी खर्चात अधिक उत्पादन!.गेल्या काही वर्षांत विदर्भ, मराठवाडा, पंजाब-हरियाना, पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागांमध्ये याचे यशस्वी प्रयोग झाले असून शेतकऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला आहे. पंजाब-हरियानामध्ये भात कापणी नंतरचे अवशेष जाळून टाकले जातात. यास बायोकल्चरचा वापर हा चांगला पर्याय दिसून आला आहे. विदर्भात कापसाच्या पऱ्हाटीचे जलद विघटन झाले. आंध्र प्रदेशात पोल्ट्री लिटर वापरून एफसीओ प्रमाणित कंपोस्ट तयार करण्यात यश मिळाले आहे..‘व्हीएनआयटी’च्या स्वाहा सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ॲग्रिकल्चरल वेस्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी केंद्राने विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (भारत सरकार) आणि मेरीनो इन्होव्हेशन सेंटरच्या अर्थसाह्याने कठीण कृषी अवशेषांचे जलद विघटन करणारे डीकंपोजर ‘बजरंग बाण’ विकसित केले आहे. या उत्पादनाचे प्रात्यक्षिक प्रयोग राबविण्यासाठी मेरीनो इंडस्ट्रीज, कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई, अंबुजा फाउंडेशन, सीआयआय फाउंडेशन, कृष्णसुधा अॅग्रोइकॉलॉजी अॅकॅडमी, एनडीडीबी मृदा प्रा.लि. आणि बालाजी मशरूम फार्मस या संस्थांनी विविध प्रकारच्या कृषी अवशेषांवर प्रयोग केले. प्रत्येक ठिकाणी बायोकल्चरचा वापर फायदेशीर ठरला आहे..Compost Fertilizer: कंपोस्ट खते देण्यासाठी ट्रॅक्टरचलित साइड ट्रेंचर, कंपोस्ट ॲप्लिकेटर.बायोकल्चर निर्मिती तंत्रया बायोकल्चरच्या वापराने कठीण कृषी अवशेषांचे जलद विघटन होते. यामध्ये सुमारे ७०० उपयुक्त सूक्ष्मजीवांचा समावेश आहे. प्रामुख्याने बॅसिलस, फायब्रोबॅक्टर, स्यूडोमोनास यांसारखे जिवाणू तसेच ट्रायकोडर्मा आणि सॅक्रोमायसिस यांसारख्या बुरशींचा समावेश आहे. या अभिनव तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट (क्र. ३६०९५६) मिळाले आहे. यामुळे ही तंत्रज्ञान प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आहे.या बायोकल्चर सूक्ष्मजीव एकत्र कार्य करून अवशेषांतील सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोजचे प्रमाण वेगाने विघटन करून पचनासाठी उपलब्ध करतात. परिणामी, अवघ्या तीन ते चार आठवड्यांत पोषक तत्त्वांनी समृद्ध असे उच्च प्रतीचे कंपोस्ट तयार होते..बाजारात अनेक डीकंपोजर उपलब्ध आहेत, पण आम्ही विकसित केलेले बायोकल्चर वेगळे आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या डीकंपोजरसाठी गूळ किंवा डाळीचे पीठ वापरावे लागते तसे आम्ही विकसित केलेल्या बायोकल्चर साठी लागत नाही. आम्ही विकसित केलेल्या बायोकल्चरचे उपसंवर्धन पोषक माध्यमामुळे फक्त ४८ तासांत पूर्ण होते.यातील सूक्ष्मजीव हे हवाबंद स्थितीत वाढणारे असल्याने कमी ऑक्सिजनच्या वातावरणात उत्तम काम करतात. यासाठी अवशेषांनाबारीक कापून त्यावर हे द्रावण फवारून ढीग सावलीत ठेवावा लागतो. कंपोस्टिंगची ही प्रक्रिया प्रारंभिक टप्पा, उष्ण टप्पा, शांत टप्पा आणि परिपक्व टप्पा या चार टप्प्यांतून जाते. या टप्प्यांमधून जात अवशेष पूर्णपणे विघटित होऊन पोषक तत्त्वांनी भरलेले, मातीच्या सुगंधाचे आणि दर्जेदार कंपोस्ट तयार होते..Compost Fertilizer Production: कंपोस्ट खत निर्मिती तंत्र करतेय जमिनीला सशक्त.क्षेत्रीय प्रयोगमेरीनो इंडस्ट्रीजमध्ये दररोज सुमारे १.५ टन भात पेंढा आणि ऊस पाचटापासून गोळा करून बजरंग बाण तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपोस्ट तयार केले जाते. याचा वापर मका, बटाटा पिकासाठी करण्यात आला. त्यामुळे पीक उत्पादनात सुमारे ५ ते १० टक्के वाढ झाली. जमिनीची सुपीकता वाढली.विदर्भात अंबुजा फाउंडेशनाने कापूस पऱ्हाटीपासून कंपोस्ट खत तया केले. या कंपोस्टच्या वापरामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होत आहे.नागपूरमधील एका कंपनीने अळंबी उत्पादनानंतर शिल्लक राहिलेले अवशेष कुजविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला. यामुळे कचऱ्याचे चांगले विघटन झाले.आंध्र प्रदेशातील कृष्णसुधा अॅग्रो इकोलॉजी अॅकॅडमी येथे पोल्ट्री लिटरचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठीचा वापर केला. त्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत..द्रावण वापरण्याची पद्धतसाधारण अर्धा लिटर बजरंग बाण हे अर्धा टन कृषी अवशेष कंपोस्ट करण्यासाठी पुरेसे ठरते. प्रथम २०० लिटर क्षमतेच्या ड्रममध्ये पाणी घेऊन त्यात अर्धा लिटर बजरंग बाण मिसळावे. त्यात १० ग्रॅम संजीवनी पोषक माध्यम आणि २५० ग्रॅम बारीक कापलेला पेंढा घालावा. हे मिश्रण नीट हलवून ड्रम घट्ट झाकून ४८ तास ठेवावे.दोन दिवसांनी तयार झालेले २०० लिटर द्रावण ३०० लिटर ताज्या पाण्यात मिसळावे. अशा प्रकारे एकूण ५०० लिटर द्रावण तयार होते, जे ५०० किलो कृषी अवशेषांवर फवारावे. यामुळे कृषी अवशेष आणि द्रव बायोकल्चर प्रमाण १:१ राखले जाते.कंपोस्टची गुणवत्ता सुधारण्यासाठी कृषी अवशेषांमध्ये कमीतकमी १० टक्के गाईचे शेण मिसळणे गरजेचे आहे. अवशेषांचे ढीग सावलीत करावेत. ८ ते १० दिवसांनी हा ढीग एकदा पालटवून घ्यावा. या प्रक्रियेतून तीन ते चार आठवड्यांत मृद्गंधयुक्त, गडद रंगाचे, पोषक तत्त्वांनी समृद्ध असे उच्च प्रतीचे कंपोस्ट तयार होते.- प्रफुल्ल दाढे ०९०२८३ ८६७९८- आदित्य पोटोडे ९८३४९ ०२३५०swaha@vnit.ac.in(लेखक स्वाहा सेंटर ऑफ एक्सलन्स,विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे नोडल अधिकारी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.