
Pune News : तुरीचा भाव मागील ६ महिन्यांत ५ हजार रुपयांनी आणि एका महिन्यात २ हजार ५०० रुपयांनी कमी झाला. आवकेचा दबाव वाढून दर कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे हमीभाव खरेदीचा शेतकऱ्यांना आधार हवा आहे. सोयाबीनप्रमाणे तुरीचे होऊ नये यासाठी खरेदी जाहीर करून नोंदणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
केंद्राने ५ राज्यांमध्ये ९ लाख ६६ हजार टन खरेदीचे उद्दिष्ट जाहीर केले. पण महाराष्ट्रात अद्यापही खरेदीचे उद्दिष्ट जाहीर झाले नाही. देशात तुरीच्या भावात जून २०२३ पासून तेजीला सुरुवात झाली. त्याचे कारण कमी पाऊस आणि कमी लागवड होते. तेव्हापासून सुरू झालेल्या तेजीने मजल दरमजल करत जून २०२४ मध्ये १२ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला.
गेल्या हंगामात तुरीची लागवड कमी होऊन उत्पादनात मोठी घट झाली होती. पण यंदा मॉन्सून चांगला बरसला. लागवडही १४ टक्क्यांनी वाढली. त्यामुळे चांगल्या उत्पादनाची चर्चा सुरू आहे. देशात यंदा तुरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने नवा माल बाजारात दाखल होण्याच्या आधीच नरमाई यायला सुरुवात झाली.
जून महिन्यातील मोठ्या तेजीनंतर बाजारात भाव कमी होत गेले. डिसेंबर महिन्यात देशातील काही बाजारात नवी तूर दाखल झाल्यानंतर दर आणखी कमी झाले. सध्या बाजार समित्यांमध्ये तुरीला ७००० ते ७, ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. म्हणजेच जून महिन्यातील उच्चांकी भावाचा विचार करता सध्याचा भाव ५ हजारांनी कमी आहे. तर नोव्हेंबरमधील भावाचा विचार केला, तर सध्या २ हजार ५०० रुपये कमी भाव आहे. तुरीला ७५५० रुपये हमीभाव आहे.
तुरीचा भाव मागील सहा महिन्यांत ५ हजारांनी आणि एकाच महिन्यात २ हजार ५०० रुपयांनी कमी झाला. अजून तर तुरीची बाजारातील आवक वाढायची आहे. ज्या भागात तुरीची लागवड आगाप झाली त्याच भागातील तूर काढणी झाली. बाजारातील नव्या मालाची आवकही अगदी किंचित आहे.
आवकेचा दबाव फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्या काळात तुरीच्या भावात आणखी नरमाई येईल का, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. कारण सध्या आवक अगदी कमी असतानाही अनेक बाजारात भाव हमीभावाच्या खाली गेले आहे. आवकेचा दबाव वाढल्यानंतर काही काळ का होईना मार्केट दाबावात येऊ शकते.
शेतकऱ्यांनी लागवडीच्या काळात तुरीच्या भावातील तेजीपासून लागवड वाढवली. पण भाव कमी झाले. अनेक शेतकरी माल आल्यानंतर लगेच विकत असतात. जे शेतकरी थांबू शकत नाही त्यांना कमी भाव मिळू शकतो. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर तुरीच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र जे शेतकरी थांबू शकत नाहीत त्यांनाही किमान हमीभाव मिळायला हवा. त्यासाठी सरकारने हमीभावाने तूर खरेदीसाठी वेळेत उद्दिष्ट जाहीर करून नोंदणी आणि खरेदी लवकर सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
पाच राज्यांमध्ये उद्दिष्ट जाहीर
केंद्र सरकारने ५ राज्यांमध्ये सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट जाहीर केले. या राज्यांमध्ये ९ लाख ६६ हजार टन खरेदी केली जाणार आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ३ लाख ९५ हजार टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. कर्नाटकात ३ लाख ६ हजार टनांचे उद्दिष्ट देण्यात आले. तर तेलंगणात १ लाख ६९ हजार टन, आंध्र प्रदेशात ९५ हजार टन आणि हरियानात ४९५ टन खरेदीचे उद्दिष्ट केंद्राने दिले. मात्र तूर उत्पादनात कर्नाटकनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात अद्याप खरेदीचे उद्दिष्टही जाहीर करण्यात आले नाही.
सोयाबीनचा अनुभव
सोयाबीनच्या हमीभाव खरेदीत अनेक अडचणी असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा किमान ९०० रुपये कमी भावात माल विकावा लागला. नोंदणी वेळेत होऊ शकत नाही, नोंदणीनंतर खरेदीसाठी महिना-महिना थांबावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खुल्या बाजारात सोयाबीन विकावी लागत आहे. तूर खरेदी करताना सरकारने या अडचणी सोडविणे आवश्यक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.