
Pomegranate Farming Management:
शेतकरी नियोजन । पीक : डाळिंब
शेतकरी : नागेश ज्ञानोब जाधव
गाव : फुलचिंचोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
एकूण शेती : साडेसात एकर
डाळिंब क्षेत्र : ३ एकर
(एकूण झाडे : ११६६ झाडे)
फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथे आमची साडेसात एकर शेती असून, त्यात डाळिंब, शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, खरबूज, काकडी, टोमॅटो आणि मका अशी पिके असतात. सिंचनासाठी एक विहीर आणि बोअरवेल आहे. २००९ पासून मी शेती करत आहे. आमच्या फुलचिंचोली आणि परिसरात ऊस हे प्रमुख पीक असून, त्यानंतर डाळिंब, द्राक्षासह हंगामी फळपिके, भाजीपाल्याचे उत्पादन होते.
बंधू संतोष आणि वडील ज्ञानोबा यांच्यासह पत्नी आणि भावजय असे आमचे एकत्र कुटुंब शेतीमध्ये राबतो. २००९ पासून आमच्याकडे डाळिंब बाग होती. दरम्यानच्या काळात तेल्या, मर रोगामुळे बाग काढावी लागवी. पण २०२१ पासून पुन्हा नव्याने डाळिंब लागवड केली आहे. दरवर्षी आंबे बहर धरतो. यंदाही जानेवारीमध्येच आंबेबहरासाठी छाटणी करून बहर धरला. सध्या डाळिंब फळ अवस्थेत आहे. डाळिंबाच्या एका झाडाला प्रति २० ते २५ किलो फळे लागतात. दरवर्षी एकरी सरासरी १० ते १२ टन उत्पादन घेतो.
व्यवस्थापनातील ठळक बाबी
संपूर्ण तीन एकर क्षेत्रामध्ये डाळिंबाचा भगवा वाण लावलेला आहे.
दोन ओळींत १४ फूट आणि दोन रोपांतील अंतर ८ फूट आहे.
प्रामुख्याने डिसेंबर - जानेवारी दरम्यान आंबिया बहर धरला जातो.
त्यासाठी जानेवारीआधीच काही दिवस बाग ताणावर सोडली जाते.
साधारण १ जानेवारी दरम्यान बागेचा ताण सोडला जातो.
या कालावधीत बागेची छाटणी केली जाते. त्या वेळी झाडावरील रोगग्रस्त वेली, फांद्या कापल्या जातात. त्यानंतर त्या बागेबाहेर नेऊन जाळल्या जातात. छाटणीदरम्यान झालेल्या जखमांच्या ठिकाणी बोर्डोची फवारणी केली जाते. त्यानंतर खोडांना बोर्डो पेस्ट लावून घेतली जाते.
बागेत शेणखत दिले जाते.
झाडाची पूर्णपणे पानगळ करून घेतली जाते.
प्रतिझाड ५०० ग्रॅम ०ः८ः४६ आणि ३०० ग्रॅम पोटॅश दिले जाते.
त्याशिवाय अॅमिनो अॅसिड, फॅालिक अॅसिड, ह्युमिक अॅसिड प्रत्येकी १० किलो सोडले जाते.
त्यानंतर प्रतिझाड २५० ग्रॅम लिंबोळी पेंडही टाकली जाते. शिवाय दुय्यम अन्नद्रव्याचा डोस दिला जातो.
डाळिंबामध्ये कीटकनाशक - बुरशीनाशकाचा वापर मर्यादित व आवश्यकतेनुसार करतो,
पाणी नियोजनामध्ये सध्या एकदिवसाआड ४ तास पाणी सोडतो. पण वाफसा पाहून ते प्रमाण कमी-जास्त केले जाते.
बागेत संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर दिला जातो. त्यामुळे फळांचा दर्जा आणि चकाकी राखण्यास मदत होते.
सुरुवातीला कळी निघताना ०ः४२ः४७, आणि ०ः६ः२० आणि ०ः५२ः३४ ही खते आलटून पालटून दिली जातात.
त्याशिवाय अॅमिनो ॲसिड, फॉलिक अॅसिड, आणि ह्युमिक अॅसिड प्रत्येकी ५०० ग्रॅम आणि त्याबरोबर २ किलो गूळ ड्रीपद्वारे सोडला जातो.
बागेतील झाडांचे आणि फळांचे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बागेवर क्रॉपकव्हर टाकण्यात आला आहे. त्यामुळे फळांचा दर्जा उत्तम मिळतो.
मागच्या पंधरवड्यातील कामे
डाळिंबाचा बहर धरून सध्या ४ महिने होत आहेत. झाडांना फळे लागलेली आहेत.
मागच्या पंधरवड्यात एकरी पाच किलो सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस दिला. सोबत १३ः०ः४५ आणि बोरॅान १ किलो दिले आहे.
बागेत सेटिंग झाल्यापासून आता डाळिंब काढणीपर्यंत दर आठवड्याला १२ः६१ः० , १३ः४०ः१३, ०ः५२ः३४ आणि ०ः०ः५० ही विद्राव्य खते एकरी प्रत्येकी पाच किलो प्रमाणात दर आठवड्यातून एकदा आलटून-पालटून सोडली जात आहेत.
वातावरण बदलानुसार रोग आणि किडीच्या प्रादुर्भावानुसार फवारणीचे नियोजन केले जाते.
वाढत्या उन्हामुळे डाळिंबाच्या बागेची पाण्याची गरज वाढलेली आहे. त्यामुळे एक दिवसाआड ५ तास पाणी सोडतो आहे.
पुढील पंधरवड्यातील नियोजन
बागेत सध्या फळे लागलेली आहेत. त्यांच्या योग्य वाढीसाठी अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करण्यात येईल.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. बागेतील पाण्याचा वाफसा पाहून पाणी नियोजन करणार आहे.
नागेश जाधव ९८२२९०१२१४
(शब्दांकन : सुदर्शन सुतार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.