
Akola News : खरीप हंगामासाठी शेतकरी बी-बियाण्याची खरेदी करू लागले असतानाच बाजारात काही वाणांची यंदाही टंचाई निर्माण करण्यात आली आहे. मागणी असलेल्या वाणांचा कंपनीने पुरवठा कमी केल्याने हे बियाणे विक्रेत्यांच्या काउंटरवरून गायब झाले आहे.
मात्र काही जण या संधीचा फायदा घेत वाढीव दराने गुपचूप विक्री करीत असल्याची खमंग चर्चासुद्धा आहे. तर हा प्रकार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने माहिती देत सहकार्य करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
खरीप हंगाम तोंडावर असतानाच जिल्ह्यात काही कपाशी वाणांची टंचाई निर्माण झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यासाठी दुकाने व बाजारपेठांमध्ये भटकंती करावी लागत आहे. टंचाईचा गैरफायदा घेत काहींनी बियाण्यांची गुपचूप वाढीव दराने विक्री सुरू केली आहे.
त्यामुळे सामान्य शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. विशेषतः मागणी असलेल्या कपाशीच्या त्या वाणाचे बियाणे पेरणीपूर्वीच संपले आहे. बियाणे संपले की जाणीवपूर्वक टंचाई तयार करून प्रसिद्धीचा फंडा केला जात आहे का, असा संशयसुद्धा काही जण व्यक्त करीत आहेत.
गेल्यावर्षी जिल्ह्यात ज्या वाणांसाठी रांगा लागल्या होत्या, ते वाण या वर्षी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून शेतकऱ्यांची पसंती नसल्याने पडून असल्याचे विक्रेते सांगत आहेत. ज्या वाणाची मागणी होत आहे, ते बाजारात आले आणि हातोहात विक्री झाले. आता मागणी असली तरी बियाणे नसल्याने शेतकरी आल्या हाताने परत जात आहेत. काही विक्रेते मात्र या संधीचे सोने करून कमाई करू लागले आहेत. काही ठिकाणी हे बियाणे नियमित दराच्या दीड पट किमतीत विकले जात असल्याचेही बोलले जाते.
कृषी विभागाचे सतर्क राहण्याचे आवाहन
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बियाणे विक्री किंवा वाढीव दराने विक्री आढळल्यास तत्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केलेले आहे. बियाणे अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, बियाण्यांची पावती/बिल घ्यावे, पॅकिंगवर वाणाचा तपशील, उत्पादक, वापर तारीख, किंमत इत्यादी माहिती तपासावी.
शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेवर न मिळणे, लिंकिंग किंवा चढ्या दराने निविष्ठांची विक्री अशा तक्रारी ७५८८४१४६९९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर दाखल कराव्यात जेणेकरून तत्काळ निवारण करता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.
काही गावांमध्ये विशेषत: दुर्गम गावांत खते व बियाणे मिळत नसल्याने दुकानांमध्ये इतर वस्तू खरेदी करण्यासाठी लिंकिंग, तसेच चढ्या दराने विक्री होत असल्याबाबत तक्रारी येत आहेत. त्यांचे निराकरण तत्काळ व्हावे यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
या क्रमांकावर तक्रार दाखल करताना शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, गाव, तालुका, संबंधित दुकानाचे नाव, ठिकाण, तक्रार, संपर्क क्रमांक व फोटो (असल्यास) अशा प्रकारे तक्रार नोंदवावी. प्राप्त तक्रारी कृषी विभाग, तसेच पोलिस यांच्या समन्वयाने तपासल्या जाणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.