AI Policy : कृत्रिम बुद्धिमत्ता उद्योगविषयक धोरण लवकरच तयार करणार

Agriculture AI : कृत्रिम बुद्धिमत्ता उद्योगाला असलेले मोठे भवितव्य लक्षात घेऊन राज्याचे या क्षेत्राबाबतचे धोरण लवकरच तयार करण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (ता. २९) जाहीर केले.
AI
AI Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : कृत्रिम बुद्धिमत्ता उद्योगाला असलेले मोठे भवितव्य लक्षात घेऊन राज्याचे या क्षेत्राबाबतचे धोरण लवकरच तयार करण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (ता. २९) जाहीर केले.

राज्यातील पहिल्या उद्योग भवनाचा भूमिपूजन समारंभ सामंत यांच्या हस्ते रविवारी येथे झाला. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या इंग्लंडच्या दौऱ्यात मूळचे कोकणातील असलेले जावकर यांची भेट झाली.

त्यांनी महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता उद्योगाच्या क्षेत्रात काम करण्यात रस दाखवला आहे. दक्षिण कोरियाच्या दौऱ्यातही या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर पाहिला. अशा प्रकारे या उद्योगाला असलेले मोठे भवितव्य लक्षात घेऊन या क्षेत्राबाबत राज्याचे धोरण तयार करण्यात येणार आहे. उद्योग विभागाचे आयुक्त दीपक कुशवाह यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असून येत्या सुमारे १५ दिवसांत त्याचा मसुदा तयार होईल अशी अपेक्षा आहे, असेही सामंत म्हणाले.

AI
Agriculture AI : रोगग्रस्त गहू दाणे ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे नमूद करून सामंत म्हणाले की, गेल्या तिमाहीत राज्यात सुमारे ३८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. उद्योजकांच्या अर्जांची प्रक्रिया करून सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात, या हेतूने उद्योग खात्यातर्फे ‘मैत्री’ कायदा मंजूर करण्यात आला आहे.

त्याच धर्तीवर उद्योगाशी संबंधित सर्व विभाग एकाच छताखाली आणण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उद्योग भवन’ बांधण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या उद्योग भवनाचा भूमिपूजन समारंभ रत्नागिरीत झाला आहे. या सहा मजली इमारतीचे एकूण सुमारे ७४ हजार फूट बांधकाम होणार असून सुमारे ३८ कोटी रुपये खर्च येणार आहे.

AI
Agriculture AI : पिकांवरील रोग, कीड ओळखण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित ॲप- ‘एआय डिस्क’

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ८ जिल्ह्यांनी उद्दिष्टाच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त मजल‌ मारली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हे प्रमाण त्या मानाने कमी आहे. नवीन उद्योगांना कर्ज मंजूर करण्यात बॅंका सकारात्मकतेने पुढे येत नाहीत, असा अनुभव आहे. त्यांना त्याबाबत समज देऊन जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करण्याबाबत कडक शब्दात सूचना दिल्या आहेत, असेही उद्योगमंत्र्यांनी नमूद केले.

कातळशिल्पांची जागा वगळून बारसू प्रकल्प

बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प कातळशिल्पे वगळून उर्वरित जागेवर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी जागा संपादित करावी लागणार आहे. तसेच येथे गोळा केलेल्या मातीचा परीक्षण अहवाल अजून प्राप्त झालेला नाही, त्यामुळे पुढील कार्यवाहीला विलंब होत असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com