Maharashtra Rain : अवकाळी आणि गारपिटीने ७५ हजार हेक्टरवर नुकसान, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Maharashtra Rain
Maharashtra Rainagrowon
Published on
Updated on

Maharashtra Rain : महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील नाशिक, धुळे, जळगाव, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी व गारपिटीने हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्याच्या उत्तर, मध्य महाराष्ट्रात, पश्चिम विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि मोठी गारपीट झाली. या गारपिटीने तब्बल ७५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक बुलढाणा जिल्ह्यात तर दुसऱ्यानंबरला जळगाव जिल्ह्याचे नुकसान झाले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील सुमारे १८ हजारांहून अधिक हेक्टरचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. अकोल्यातही १७ हजार ६९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात ११ हजार ९५ हेक्टरवरील रबी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पुढचे काही दिवस पाऊस

विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. आज (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणातही विजांसह पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या हवामानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. किमान तापमानाचा पारा वाढल्याने गारठा नाहीसा झाला असून, दुपारी उन्हाचा चटका, उकाड्यामुळे घामटा निघत आहे. बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या जवळपास आहे.

बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३४.८ (१८.१), धुळे ३३.० (१५.५), जळगाव ३३.९ (१८.७), कोल्हापूर ३४.५ (२२.९), महाबळेश्वर २८.८ (१७.६), मालेगाव ३५.० (१९.४), नाशिक ३४.२ (१७.४), निफाड ३२.० (१३.५), सांगली ३५.२ (२२.१), सातारा ३४.८ (२१.५), सोलापूर ३६.२ (२२.८).

सांताक्रूझ ३३.६ (२०.६), डहाणू ३२.० (१९.८), रत्नागिरी - (२२.३), छत्रपती संभाजीनगर ३३.६ (१९.७),नांदेड ३४.२ (२२.४), परभणी ३४.७ (२१.०), अकोला ३२.२ (२०.६), अमरावती ३३.२ (१९.३), बुलडाणा ३१.४ (१८.०), चंद्रपूर ३५.८ (१८.२), गडचिरोली ३३.४ (१९.४), गोंदिया ३२.८ (१८.४), नागपूर ३४.० (१९.८), वर्धा ३५.०(१९.६), वाशीम ३६.० (१८.५), यवतमाळ ३५.० (२०.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com