
Chhatrapati sambhajinagar News : आधी पश्चिम नद्यांतील पाणी जायकवाडी प्रकल्पात आणा, नंतरच जायकवाडी मधील पाण्याला हात लावा असा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेने दिला आहे. स्वातंत्र्यदिनी जायकवाडीचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या पैठण येथील पुतळ्याला अभिवादन करून अन्नदाता शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या सहयोगातून हा एल्गार पुकारला आहे.
जायकवाडी प्रकल्पामधून छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरांसाठी समांतर पाणी योजनेच्या माध्यमातून मोठ्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. समांतर योजनेचे पाईप पाहिले तर एवढे पाणी जर रोज पिण्यासाठी जाणार असेल तर शेतीसाठी पाणीच शिल्लक राहणार नसल्याचा दावा अन्नदाता संघटनेने केला आहे. समांतरच्या माध्यमातून शहरवासियांना पाणी देण्याला शेतकऱ्यांचा विरोध नाही, परंतु आधी पश्चिमी वाहिन्यांकडील नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणावे आणि उचलल्या जाणाऱ्या पाण्याची तूट भरून काढावी.
ज्या कंपन्या जायकवाडीचे पाणी वापरतात त्यांच्या विकास फंडातून जायकवाडीमधील गाळ काढून सरकारने स्वखर्चाने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकावा. त्यामुळे जायकवाडीच्या धरणातील पाणीसाठा वाढेल, याची दखल न घेतल्यास समांतर योजनेचा विद्युत पंप कोणत्याही परिस्थितीत सुरू न होऊ देण्याचा इशाराही अन्नदाताने दिला आहे. जायकवाडी लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना या धोक्याची घंटा वाजवून प्रत्येक गावातील सह्यांची निवेदन सरकारकडे पाठविण्याला अन्नदाता शेतकरी संघटनेने स्वातंत्र्यदिनी प्राथमिक सुरुवात केली आहे. त्यावेळी अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी पाटील यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.