
Chhatrapati Sambhaji Nagar News : औरंगाबाद जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांमध्ये आतापर्यंत ३९६ जनावरांना लम्पी स्कीनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या आजाराचा फैलाव जनावरांमध्ये होऊ नये, यासाठी पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घेऊन सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकूण गायवर्गीय पशुधन ५ लाख ३८ हजार ५७२ इतके असून, त्यापैकी ३९६ जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. डी. झोड यांनी दिली आहे. जिल्ह्यात गोवर्गीय जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ३ लाख ६९ हजार ५२६ जनावरांचे म्हणजेच ६९ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आपल्या जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केले आहे.
लम्पी आजारामध्ये जनावरांना ताप येतो. चारा व पाणी कमी घेतले जाते किंवा बंद होते. नाका डोळ्यातून चिकट स्त्राव येतो. जनावरांच्या अंगावर गाठी येतात आणि पायावर सूज येऊन जनावर लंगडते. अशी सर्वसाधारण लक्षणे दिसून येतात.
बाधित जनावर इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. बाधित जनावराबाबत नजीकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयास सूचना द्यावी. जनावरांवर उपचार करून घ्यावेत. आजार नियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधित गावापासून पाच किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांतील चार महिने वयावरील गाय वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे. आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी -विक्री थांबवावी, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. डी. झोड यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.