
Amaravati News : नळगंगा- वैनगंगा नदी जोड प्रकल्पात संत्रापट्टा असलेल्या वरुड, मोर्शीसह काटोल व नरखेडला वगळण्यात आले. यातील बहुतांश परिसर ड्रायझोन असल्याने या भागाचा या प्रकल्पात समावेश करावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप त्यांचा प्रतिसाद नसल्याने याकरिता शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार ) नेते अनिल देशमुख यांनी दिला.
एका कार्यक्रमानिमित्त अमरावतीला आलेल्या अनिल देशमुख यांनी शनिवारी (ता. २६) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला व बुलडाणा या सहा जिल्ह्यातील एकूण तीन लाख ७१ हजार २७७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून एकूण ४२६ किलोमीटर लांबीचा कालवा असणार आहे. मात्र या प्रकल्पात संत्रापट्टा असलेल्या वरुड, मोर्शी, काटोल व नरखेड या तालुक्यांचा समावेश झालेला नाही.
आम्ही या बाबत मुख्यमंत्र्यांकडे यापूर्वी विनंती सुद्धा केली होती, मात्र ती मान्य करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. वरुड, मोर्शी, काटोल व नरखेड या भागातील भूजल पातळी ही ८०० फुटांपेक्षा खाली गेल्यामुळे या भागाला डार्कझोन म्हटले जाते.
पाण्याअभावी या भागातील संत्रा व मोसंबी बागा वाळून जात आहेत. परिणामी शेतकरी संकटात सापडले आहे. संत्रा, मोसंबीच्या लागवडीचे क्षेत्र सुद्धा कमी झाले असून सरकारने या भागांचा समावेश नदीजोड प्रकल्पात केला पाहिजे, अशी मागणी अनिल देशमुख यांनी यावेळी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल जळमकर, शहराध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष घनेश रॉय, माजी जिल्हाध्यक्ष भास्करराव ठाकरे, सतीश आंडे, सतीश चरपे, मंगेश भटकर व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.