Sugarcane Kolhapur : आंदोलन अंकुशने ठेवला साखर कारखान्यांच्या वजन काट्यांवर 'अंकुश', ७७ कोटींचा थेट फायदा

Weight Bridge Sugarcane : ‘शेतकरी वजन काट्याचा शेतकऱ्यांना जसा फायदा झाला तसा तो ऊस वाहतूकदारांना व ऊसतोड मजुरांनाही झालेला आहे.
Sugarcane Kolhapur
Sugarcane Kolhapuragrowon
Published on
Updated on

Andolan Ankush Kolhapur : ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने उभारण्यात आलेल्या वजन काट्यामुळे परिसरातील अनेक कारखान्यांना आपले वजन काटे चोख ठेवावे लागले. या काट्यामुळे कारखान्यांच्या वजनातील त्रुटी लक्षात आल्याने ‘आंदोलन अंकुश’च्याच काट्याच्या वजनाप्रमाणे रक्कम दिली. यामुळे शेतकऱ्यांना पहिल्याच वर्षी काटामारीतून नुकसान होणारे ७७ कोटी ५० लाख रुपये मिळाले असल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’ संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी रविवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत दिली. ‘शेतकऱ्यांसह अन्य घटकांना मिळून ९३ कोटी रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

चुडमंगे म्हणाले, ‘आंदोलन अंकुशच्या पुढाकाराने शिरोळ-नृसिंहवाडी रोडवर मोफत शेतकरी वजन काटा उभारण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या उसाची वाहने मोठ्या प्रमाणात या वजन काट्यावर वजन करून मगच तो ऊस कारखान्याला पाठवल्याने भागातील कारखान्यांना आपले वजन काटे यावर्षी चोख ठेवावे लागले. त्याचा परिणाम म्हणून या भागातील उसाचे एकरी उत्पादन वाढून शेतकऱ्यांचा जवळपास ७७ कोटी ५० लाख रुपये पहिल्याच वर्षी फायदा झाला आहे. या भागातील विविध साखर कारखान्यांचे एकूण गाळप हे ५० लाख टनापेक्षा जास्त झाले आहे. २० टनाच्या एका सांगडीला सरासरी एक टन उसाची काटामारी धरली तर वजनाच्या पाच टक्के काटामारी होते.

५० लाख टन उसाचे पाच टक्क्याने अडीच लाख टन ऊस होतो, या अडीच लाख टन उसाचा दर सरासरी ३१०० रुपये धरला तर ७७ कोटी ५० लाख रुपयांची काटामारी या शेतकरी वजन काट्यामुळे रोखली गेली आणि ते ७७ कोटी ५० लाख रुपये शेतकऱ्यांना थेट मिळाले. त्यामुळे शेतकरी वजन काट्याचा शेतकऱ्यांना फायदाच झाला असल्यामुळे हा काटा उभारणीचा आमचा उद्देश साध्य झाला.’

Sugarcane Kolhapur
Sugarcane Season : अंदाजापेक्षाही १३१ लाख टन जादा उसाचे गाळप

ते पुढे म्हणाले, ‘शेतकरी वजन काट्याचा शेतकऱ्यांना जसा फायदा झाला तसा तो ऊस वाहतूकदारांना व ऊसतोड मजुरांनाही झालेला आहे. अडीच लाख टन जो काटामारी पासून वाचलेला ऊस आहे, त्याचा वाहतूक खर्च कमिशनसह हा सरासरी प्रतिटन २२० रुपये धरला, तर ५ कोटी ५० लाख रुपये होतात आणि मजुरांचा कमिशनसह प्रतिटन तोडणी खर्च चारशे रुपये धरून त्याचे दहा कोटी रुपये होतात.

वाहतुकीचे व तोडणी मजुरीचे असे दोघांचे मिळून १५ कोटी ५० लाख रुपये त्यांना या शेतकरी वजन काट्यामुळे जादा मिळालेले आहेत. शेतकऱ्यांच्या बरोबर तोडणी व वाहतूकदार पण या काट्यामुळे फायद्यात आले. शेतकऱ्यांसह अन्य घटकांना मिळून ९३ कोटी रुपये मिळाले. काटा नसता तर ही रक्कम मिळाली नसती.’

राज्यात प्रत्येक भागात असे काटे झाले पाहिजेत

‘शेतकऱ्यांच्या मदतीतून उभा राहिलेल्या या वजन काट्याला ३३ लाख रुपये उभारणीसाठी खर्च आला होता. ३३ लाखाच्या वजन काट्यामुळे वर्षाला जर ७७ कोटी रुपयांचा फायदा होत असेल तर असे काटे महाराष्ट्रात प्रत्येक भागात झाले पाहिजेत व यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा’, असे आवाहन चुडमुंगे यांनी केले.

मोफत वजनाचा शब्द पाळला

चुडमुंगे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील सहा कारखाने व कर्नाटक सीमाभागातील तीन असे एकूण नऊ साखर कारखान्यांची एकूण २६०० वाहने शेतकरी वजन काट्यावर वजन करून गेली. या सर्व वाहनांची वजने ही मोफत केली असून काटा उभारणीच्या वेळी मोफत वजनाचा दिलेला शब्द आम्ही पाळला असल्याचे समाधान आम्हाला आहे.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com