
साधारण चौऱ्याहत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. अहमदनगर जिल्ह्यात मुळा नदीला मोठा पुर (Flood) आला होता. साथीच्या आजारांनी (Epidemic Diseases) थैमान घातले. गोरगरीब लोकांना आरोग्य सुविधा (Health Service) मिळाल्या नसल्याने त्यांचे हाल झाले. त्यातून राहुरी, नेवासा तालुक्यासह मुळा नदीकाठच्या गावांतील अनेकांना जीव गमवावा लागला.
त्या वेळी चौदा वर्षांचे असलेले रजनीकांत आरोळे राहुरीत शिक्षण घेत होते. त्यांचे आई-वडील राहुरीत शिक्षक होते. रजनीकांत यांना लोकांचे हाल पाहवले नाही. त्याच वेळी त्यांनी गरीब माणसाच्या आरोग्यासाठी काम करायचा निश्चय केला. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा टर्निंग पॉइंट ठरला.
रजनीकांत यांनी जिद्दीने १९५४ ते १९५९ या काळात तमिळनाडूमधील वेल्लोरच्या प्रसिद्ध ‘सीएमसी' वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तेथे जबलपूर (उत्तर प्रदेश) येथील मेबल याही शिक्षण घेत होत्या. त्यांचीही सामाजिक सेवेचे विचारसरणी होती. डॉ. रजनीकांत यांची त्यांच्याशी ओळख झाली.
ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे १९५९ मध्ये विवाहबद्ध झाले. त्यानंतर दोघांनाही पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेतील प्रतिष्ठेची ‘फुलब्राइट शिष्यवृत्ती’ मिळाली. डॉ. रजनीकांत यांनी चार वर्षे शल्यचिकित्सेचे, तर डॉ. मेबल यांनी हृदयरोगासंबंधीचे शिक्षण पूर्ण केले.
अमेरिकेतील शिक्षणानंतर भारतात परत येऊन काम करण्याचं त्यांनी आधीच ठरवलं होतं. जो प्रदेश आरोग्य सुविधांपासून वंचित आहे, मागास आहे, जिथं अज्ञानी मातांची संख्या जास्त आहे, बालमृत्यू, कुष्ठरोग, दमा, क्षयरोगाचं प्रमाण अधिक आहे, जिथं लोकांमध्ये जागृतीची अधिक गरज आहे अशा भागाच्या ते शोधात होते. अशा ठिकाणी आरोग्यविषयक काम करण्यात आपलं जीवन समर्पित करण्याचा पक्का निश्चय दोघांनी केलेला होता.
संस्थेची सुरुवात
आरोळे दांपत्य आपलं काम सुरू करण्यासाठी योग्य प्रदेशाचा शोध घेत होते. त्या वेळी त्यांना नगर जिल्ह्यातील जामखेड आणि शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भाग अत्यंत दुर्गम, मागास असल्याचं लक्षात आलं. जिथं काम सुरू करायचं, तिथं स्थानिक लोकांचा सहभाग मिळावा, असं त्यांचं धोरण होतं. त्याकाळी स्थानिक नेत्यांच्या शब्दाला मोठा मान होता. आरोळे दांपत्याने १९७० च्या सुरुवातीला उस्मानाबादमधील मागास भागात काम सुरू केलं.
मात्र लोकांचा सहभाग फारसा मिळाला नाही. स्थानिक नेत्यांकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. ही बाब जामखेड येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी बन्सीलाल कोठारी यांना समजली. आपल्या भागातील सामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी चांगलं काम उभं राहील, या हेतूने त्यांनी आरोळे दांपत्याला जामखेडला येण्याची विनंती केली.
आरोळे दांपत्य त्यानुसार जामखेडला आले आणि एका छोट्या खोलीत राहून काम सुरू केलं. इथं खरंच आरोग्यसेवेची गरज असल्याचं त्यांना जाणवलं. आपला संकल्प इथे सार्थकी लागेल, अशी आशा बळावली. याच उमेदीने त्यांनी १९७० मध्ये ‘ग्रामीण आरोग्य प्रकल्प’ या संस्थेची स्थापना केली. ही संस्था पन्नास वर्षांपासून कर्जत जामखेडसह परिसरातील लोकांच्या आरोग्याचा आधार बनली आहे...
(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)
अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.
अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -
अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.