Pune News : गेल्या काही वर्षांमध्ये वातावरणातील जमिनीपासून १२ ते १३ किलोमीटरच्या भागात वेगवेगळे थर असतात. या भागात चालू वर्षी मोठे बदल झाले आहे. प्रामुख्याने अमोनिया आणि अमोनियम नायट्रेटचे जास्त प्रमाण आढळून आल्याचे सॅटेलाईटमध्ये स्पष्ट झाले आहे.
हे पहिल्यांदाच दिसून आल्याने यावर जगभरातील हवामान शास्त्रज्ञ एकत्रित येऊन संशोधन करणार आहेत, अशी माहिती भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. आर. कृष्णन यांनी दिली.
भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेच्या वतीने ‘वातावरणातील समान भाग असलेल्या वातावरणाची स्थिती आणि हवामानाचा पूर्वअंदाज’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा पुण्यातील मेघदूत सभागृह येथे सोमवारी (ता. ३) आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. कृष्णन बोलत होते.
या वेळी पृथ्वी मंत्रालयाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन, अमेरिकेतील वातावरणीय प्रकिया आणि त्याची भूमिका (एपीएआरसी) या संस्थेचे संचालक डॉ. रोल्फ मुलर, जागतिक हवामान संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एस्टेली डी. कनिंग, भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेच्या वतीने वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. मुखोपाध्याय, डॉ. सुवर्ण फडणवीस आदी उपस्थित होते.
श्री. कृष्णन म्हणाले की, वातारणाच्या ओझोन भागात सल्फेट, सेंद्रिय कर्ब, अमोनिया, नायट्रेट या प्रमाणाचा दरवर्षी अभ्यास होतो. आतापर्यंत हे प्रमाण समान होते. चालू वर्षी या प्रमाणापैकी दोन घटकांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे.
यामुळे ओझोनच्या भागामध्ये प्रदूषण वाढत आहे. हे कुठून आले आहे याची चर्चा सुरू झाली आहे. प्रामुख्याने हे नायट्रेट कृषी क्षेत्रातून आले आहे का याचे संशोधन करणार आहे. या सर्व घटकांचा परिणाम मॉन्सून, पाऊस आणि तापमानासह इतर काही घटकांवर होणार आहे का याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
याशिवाय सूर्यकिरणे जमिनीवर येत असताना सूर्यकिरणावर काही बदल होताहेत का याचाही अभ्यास केला जाईल. त्याउद्देशाने ही पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत जगभरातील ३०० हून अधिक विविध शास्त्रज्ञांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे.
यामध्ये विविध तज्ज्ञ आपली मते मांडणार असून शेवटच्या दिवशी या परिषदेतील अंतिम निष्कर्षाचा अहवाल हा केंद्र सरकारला सादर करणार आहेत. तसेच कार्यशाळेत नवीन तरूण शास्त्रज्ञांना जमिनीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या विविध घटकांची मोजणी कशी करायची, त्यासाठी कोणते उपकरणे वापरायचे, त्यातून माहिती गोळा कशी करायची याचेही प्रशिक्षण दिले जात आहे.
पृथ्वी मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन म्हणाले की, मागील काही वर्षांत वेगाने बदल होत आहे. त्यामुळे हवामानातील बदल हा एक महत्त्वाचा विषय बनत चालला आहे. त्यावर आता स्वतंत्ररीत्या संशोधन होण्याची आवश्यकता असून त्यामुळे हवामानात अचूकता येईल. सध्या बदलत्या हवामानामुळे हवामान विभागाला अंदाज देण्याचे एक आव्हान आहे. ही एक चर्चा पुण्यात होत असल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.