
Akola Kharip Season : खरीप हंगामातील पीक पेरणीचा अभ्यासपूर्वक अंदाज घेऊन बियाणे व खतांचे काटेकोरपणे नियोजन करून कृषी विभागाने अंमलबजावणी करावी. तसेच काळाबाजार होणार नाही, शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावे, त्याची फसवणूक होणार नाही व शासन बदनाम होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.
अकोला तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. बैठकीला आमदार अमोल मिटकरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नयन सिन्हा, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे, हरीश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत आमदार सावरकर, आमदार मिटकरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन रवींद्र ढवळे (बोरगाव मंजू), वैशाली बोर्डे (पळसो), नारायणराव पतंगे (कानशिवणी), ज्ञानदेव ढगे (चिखलगाव), शिवहरी गावंडे तसेच दिनेश फोकमारे (एकलारा) या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
तालुक्यातील विविध पिकांखालील खरीप पिकाचे क्षेत्र, पाऊस, उपलब्ध बियाणे, खते, कीटकनाशके या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. व्यापाऱ्यांनी साठवणूक करून मागणी असणाऱ्या बियाण्याचा काळाबाजार करणार नाही व शेतकऱ्यांची फसवणूक करणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे, असे आमदार सावरकर म्हणाले.
पूर्वानुभव लक्षात घेता बियाणे व खतांची साठेबाजी तसेच कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे असे सूचवत सावरकर पुढे म्हणाले, की नुसत्या सांख्यिकी आकडेवारीवर विसंबून न राहता कृषी खात्याने शेतकऱ्यांशी संवाद साधावा व क्षेत्र निश्चित करावे.
मागील वर्षी सोयाबीन पिकाचे उत्पादन कमी होण्याची कारण मिमांसा करावी. तसेच सुकळी, कानशिवणी या परिसरात मुग पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा सुद्धा अभ्यास करण्यात यावा. नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेत दुबार पेरणीचे संकट उद्भविल्यास राखीव साठ्याची तजवीज कृषी विभागाने करावी. बैठकीमध्ये पीकविमा, पंतप्रधान शेतकरी सन्मान विमा योजना, मागेल त्याला शेततळे अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.खरीप हंगाम २५-२६ करिता कृषी खात्याकडून पीक क्षेत्राबाबत केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा
या वर्षी कृषी खात्याकडून तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन पिकांतर्गत ४५१५५ हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले. कपाशी पिकाखाली ३३५०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. या खालोखाल तूर पिकाखाली १२५०० हेक्टरवर नियोजन आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांना मिळावा यासाठी अधिकारी वर्गाने महत्त्वाची भूमिका बजावी अधिकारी सुद्धा ग्रामीण भागातून आले असल्यामुळे ग्रामीण भागातील समस्या व अडचणी माहीत असल्यामुळे आपण अधिकारी सोबत ग्रामीण पुत्र असल्याचा लक्ष घेऊन शेतकऱ्याला मदत करा, अशी ही आमदार सावरकर म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.