
Ahilyanagar News : पंतप्रधान आवास योजनेतून अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात ५८ हजार ६६९ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५५ हजार ४९५ घरकुलाची कामे पूर्ण झाली आहेत. शिवाय घरकुले मंजूर असूनही बांधकामासाठी जागा नसल्याने अडचणी येत असलेल्या ६ हजार ९४८ भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे.
या दोन्ही कामांमुळे अहिल्यानगर जिल्हा राज्यात अमृत महाआवास अभियानाअंतर्गत जिल्ह्याला राज्यात प्रथम आला आहे. दुसऱ्या टप्प्यात ८२ हजार घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी सर्व घरांना मंजुरी दिली आहे.
ग्रामीण भागात गोरगरीब, घरे नसलेल्या कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळावीत यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागासाठी यंदा पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात या टप्प्यात ८२ हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्या सर्व लाभार्थ्याच्या सर्व घरांना मंजुरी दिली. लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हप्ता वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान आवास योजनेतून जास्तीत जास्त घरे बांधण्यासाठी आणि ती दर्जेदार व्हावीत यासह घरकुल मंजूर होऊनही जागा नसल्याने घरापासून वंचित राहत असलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांत गावठाणाचा विस्तार करत ४ हजार घरकुलांसाठी शेती महामंडळाची जमीन उपलब्ध करून दिली आहे.
गायरान जमिनीवरील घरकुले हटवली जाऊ नयेत यासाठी गतकाळात निर्णय केला आहे. प्रत्येक गावामध्ये सरपंच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून गावठाण विस्तारीत प्रस्ताव मंजूर करून घेण्याबरोबरच गायरानातील घरकुले नियमित करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष मोहीम आखण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेतून घरे उभारणीत पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा पहिला क्रमांक आला आहे.
जीवनमान उंचावेल : विखे पाटील
अहिल्यानगरला घरकुल लाभार्थ्यांसाठी कार्यशाळा झाली. या वेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, १०० दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक शासकीय जमीन घरकुलांसाठी उपलब्ध करून देत समाजातील प्रत्येकाला घरकुल देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
समाजातील प्रत्येक गोरगरिबाला हक्काचे व परवडणारे घर देण्याचे काम पंतप्रधान आवास योजनेतून करण्यात येत आहे. यातून सामान्य लोकांचे जीवनमान उंचावेल. समाजातील एकही गोरगरीब घरापासून वंचित राहू नये.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.