
देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत. तुरीच्या डाळीचेही भाव वाढले आहेत. सरकार तुरीचे भाव दबावात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पुरवठा कमी आहे. पुढील महिन्यापासून आफ्रिकेतील तूर बाजारात येईल. पण देशातील पीक महत्वाचे आहे. यंदा गेल्यावर्षीपेक्षा लागवड साडसहा टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे सहाजिकच उत्पादन कमी राहणार. दुष्काळी स्थितीचाही फटका पिकाला बसत आहे. सध्या तुरीचे भाव ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीतील तेजी पुढील काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे.
२. कापूस दरात सुधारणा
देशातील बाजारात कापूस दरातील सुधारणा कायम आहे. देशातील कापूस लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास २ टक्क्यांनी वाढल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. पण पावसाचं प्रमाण बघता उत्पादनाविषयी चिंता आहे. त्यातच आता कापसाची मागणी वाढलेली आहे. परिणामी भाव वाढत आहेत. आज कापसाला बाजार समित्यांमध्ये सरासरी ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला. विशेष म्हणजे आता बहुतांशी बाजारांमधील सरासरी भाव किमान ७ हजारांच्या पुढे सरकला. दरातील ही वाढ टिकून राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
राज्यातील बाजार गवारचे भाव तेजीत आहेत. श्रावण महिना सुरु झाल्यामुळे भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढलेले दिसतात. सध्या बाजारात गवारची आवक खूपच कमी दिसते. दुसरीकडे मात्र उठाव चांगला आहे. यामुळे गवारचे भाव सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. गवारचे भाव पुढील काळातही कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
मक्याचा बाजार मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसतो. भारतीय मक्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. अर्जेंटीना आणि युक्रेनमधून कमी पुरवठा होतोय. यामुळे देशातून निर्यात वाढत आहे. आज देशातील बाजारात मक्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपये भाव मिळाला. खरिपातील माल येईपर्यंत मक्याचे भाव सरासरी २ हजार ३०० रुपयांवर राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात मागील तीन महिन्यांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. भावात चढ उतारही दिसत आहेत. पण सोयाबीनच्या भावाला मागील तीन मिहिन्यांमध्ये मोठा आधार मिळालेला नाही किंवा भावात मोठी तेजी आली नाही. यामुळे सहाजिकच सोयाबीन स्टाॅक असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली. सध्या बाजारात सोयाबीन आवक कमी झालेली असली तरी अनेक प्रक्रिया प्लांट्स आता मेंटनन्सवर आहेत. ऑक्टोबरमध्ये सोयाबीन आवक सुरु होते. त्याआधी प्लांट्सचे मेंटनन्स पूर्ण करण्यावर भर असतो. त्यामुळे सोयाबीनच्या खेरदीसाठी जास्त स्पर्धा दिसत नाही. यामुळे बाजारात सोयाबीन आवक कमी दिसत असली तरी दरात फारसा फरक दिसत नाही. त्यातच देशात खाद्यतेलाची आवक वाढली आहे. आयातीचा दबावही सोयाबीनवर आहे.
मागील तीन महिन्यांपासून अपवाद वगळता सोयाबीन भाव प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ४०० ते ५ हजारांच्या दरम्यान आहे. यंदाही सोयाबीनची लागवड गेल्यावर्षीच्या पातळीवर पोचली. पण पावसाचं काही खरं दिसत नाही. ऑगस्टमध्ये आतापर्यंत पाऊसच नाही. त्याचा महत्वाच्या सोयाबीन महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जास्त फटका बसतोय. यामुळे उत्पादन किती राहील हे सांगता येत नाही. पण पावसाने आणखी काही दिवस खंड दिला तर उत्पादनात घट येण्याची शक्यता स्पष्ट होईल. यामुळे दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.