Shaktipith Highway : उपजीविकेचे शेती हेच एकमेव साधन

Land Acquisition : आधीच ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. पक्के रस्ते नाहीत. शेतीमाल वाहतुकीसह दळणवळणासाठी वर्षानुवर्षे शेतकरी, ग्रामस्थांना अडचणी येत असतात.
Shaktipith Hghway
Shaktipith HghwayAgrowon

Parbhani News : आधीच ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. पक्के रस्ते नाहीत. शेतीमाल वाहतुकीसह दळणवळणासाठी वर्षानुवर्षे शेतकरी, ग्रामस्थांना अडचणी येत असतात. शेतीचा विकास होत नाही.

सरकारने पर्यायी रस्ता असताना मध्येच या नागपूर-गोवा महामार्गाचा घाट कशासाठी घातला असा सवाल हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह संघटनांनी केला आहे. तसेच उपजीविकेचे शेती हे साधनच नष्ट होणार असल्याने हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग हिंगोली, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ७५ गावांतून जात आहे. या जिल्ह्यांतील महामार्गाची लांबी १३१ किलोमीटर असून त्यासाठी सुमारे १ हजार ५५४ हेक्टर जमीन संपादन केली जाणार आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार असल्याने या जिल्ह्यांत अस्वस्थता वाढली आहे.

नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी सुमारे ८०२ किलोमीटर आहे.परभणी-हिंगोली जिल्ह्यात ड्रोनव्दारे या महामार्गाचे सर्वेक्षण केले जात आहे. या महामार्गाची हिंगोली जिल्ह्यातील लांबी ३४ किलोमीटर आहे.

हा महामार्ग जात असलेली हिंगोली जिल्ह्यातील गावे इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा, पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येतात. संपादित केली जाणारी बहुतांश जमीन ही बागायती प्रकारची आहे. शेतकरी केळी, ऊस, हळद यासह फळे भाजीपाल्यासह सोयाबीन, तूर, हरभरा आदी जिरायती क्षेत्रातील पिके घेतात.

Shaktipith Hghway
Shaktipith Higway : आमच्या तर जगण्याचा आधारच हिरावला जाणार !

परभणी जिल्ह्यातील लांबी ७१ किलोमीटर आहे. हा महामार्ग जात असलेली बहुतांश गावे सिद्धेश्वर, जायकवाडी, माजलगाव या मोठ्या प्रकल्पांच्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील आहेत. ऊस, हळद, केळी ही प्रमुख बागायती पिके तसेच कापूस व सोयाबीन या जिरायती पिकांचे क्षेत्र मोठे आहे. खोल काळ्या जमिनीचे क्षेत्र अधिक आहे.

नांदेड जिल्ह्यातील या महामार्गाची लांबी २६ किलोमीटर आहे. उर्ध्व पैनगंगा व सिद्धेश्वर प्रकल्पांच्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील बागायती जमीन या महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे.या भागातील शेतकरी ऊस, केळी, हळद ही पिके घेतात. येथेही काळी सुपीक जमीन आहे.

शेतकऱ्यांचा विरोध...

शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही अद्याप सुरु झालेली नाही. मावेजाचे दर देखील जाहीर झालेले नाहीत. प्राथमिक अधिसूचना निघाली आहे. त्यानुसार भूसंपादनासाठी गट निहाय जमीन क्षेत्राची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे भूसंपादन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. परभणी जिल्ह्यातील काही भागात ड्रोनव्दारे सर्वेक्षण केले जात आहे. परंतु शेतकरी त्यास विरोध करत आहेत.

नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग स्थिती

हिंगोली जिल्हा

एकूण लांबी : ३४ किलोमीटर

तालुके : कळमनुरी, वसमत

गावे : एकूण २२

कळमनुरी तालुका - दाभडी, महालिंगी, झुनझुनवाडी, भाटेगाव, जामगव्हाण, सुकळीवीर, डोंगरकडा, जवळा पांचाळ, वसफळ,

वसमत तालुका - गिरगाव, पळसगाव तर्फे माळवटा, गुंज, रूंज तर्फे आसेगाव, आसेगाव, टाकळगाव, राजापूर, बाभूळगाव, रेनकापूर, लोणी बु., हयातनगर, जवळा खुर्द., जवळा बुद्रूक

गट संख्या : ४११

प्रस्तावित भूसंपादन क्षेत्र : ४३०.३७९१ हेक्टर

Shaktipith Hghway
Shaktipith Highway : शक्तिपीठ महामार्गाला गावागावातून तीव्र विरोध, शेतकऱ्यांचे उपोषण

परभणी जिल्हा

एकूण लांबी : ७१ किलोमीटर

तालुके : पूर्णा, परभणी, सोनपेठ

गावे : एकूण ३१

पूर्णा तालुका : सूरवाडी, आहेरवाडी, नावकी, कात्नेश्वर, पिंपळगाव बाळापूर, सदलापूर.

परभणी तालुका : उखळद, बाभळी, पिंगळी, शेंद्रा, टाकळगव्हाण, लोहगाव, जवळा, सहजपूर, आमडापूर, ताडपांगरी, आंबेटाकळी, पोखर्णी नृसिंह, दैठणा, इंदेवाडी, साळापुरी.

सोनपेठ तालुका : शिरोरी, डोंबाडी तांडा, शिर्शी बुद्रूक, कान्हेगाव, सायखेडा, शेळगाव हटकर, नरवाडी, कोठाळा, डिघोळ ई, धामोनी

गट संख्या : ६४८

प्रस्तावित भूसंपादन क्षेत्र : ७३३.९७३९ हेक्टर

एकूण लांबी : २६ किलोमीटर

तालुके : हदगाव,अर्धापूर

गावे : एकूण २२

हदगाव तालुका : पेवा, करोडी, काळेश्वर, वेळांब, उंचेगाव खु., आडा, रुई, पळसा, बरडशेवाळा, कवाना, बामणी, बामणीतांडा, चिंचगव्हाण, जगापूर, मनाठा, वरवट, जांभळंसावली

अर्धापूर तालुका : भोगाव, उंबरी, मालेगाव, धामदरी, देगाव कुऱ्हाडा

गट संख्या : ४३९

प्रस्तावित भूसंपादन क्षेत्र : ३९०.०५६७ हेक्टर

शक्तिपीठ महामार्गासाठी सुपीक-बागायती जमीन संपादित केल्यानंतर आमच्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी भूमिहीन होतील. जिल्ह्यात याआधी झालेली सिमेंटच्या महामार्गाची कामे टिकावू नाहीत. सिमेंटचे रस्ते पर्यावरण अनुकूल नाहीत. वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते असताना शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता नाही.
- डॉ. राहुल पाटील, आमदार, परभणी.
शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकरी उध्वस्त होणार आहेत. मराठवाड्यातील सर्व मोठ्या सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील कालवे उध्वस्त होतील. त्यामुळे १ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन कायमची कोरडवाहू होईल. या मार्गावर ट्रॅक्टर, बैलगाडी, रिक्षा आदी वाहने चालविता येणार नाहीत. सर्व्हिस रोडची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना उपयोग होणार नाही. सुमारे ४०हजार एकर जमीन कवडीमोल दराने ताब्यात घेऊन त्या भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचा हा प्रकल्प आहे.
- कॉम्रेड राजन क्षीरसागर, सरचिटणीस, राज्य किसान सभा
शक्ती पीठ महामार्गामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. महामार्गासाठी संपादित केली जाणारी संपूर्ण जमीन बागायती आहे. नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग एक वर्षापूर्वीच तयार झाला आहे. त्यावरच वाहतूक नाही. त्याला संलग्नच या महामार्गाचा अट्टहास का? परभणी जिल्ह्यात शेती मुख्य व्यवसाय आहे, दुसरे उद्योग नाहीत. या महामार्गामुळे भूमिहिन झालेले शेतकरी उद्ध्वस्त होतील यात शंका नाही. त्यामुळे महामार्गास आमचा विरोध आहे.
- किशोर ढगे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी, संघटना, परभणी.
शक्तिपीठ महामार्गासाठी ड्रोनव्दारे हवाई सर्वेक्षण करण्यात आले आहे. शेतावर येऊन अद्याप कोणीही पाहणी केलेली नाही. आमची गट क्रमांक १४५ मधील २ हेक्टर ४५ आर जमीन संपादित केली जाणार हे अधिसूचनेतून समजले. आमची सुपीक जमीन आहे. तीन विहीर, दोन बोअरचे पाणी आहे. इसापूर कालव्याचा लाभ मिळतो. केळी, हळद, ऊस पिके घेतो. याआधी कालवा व विजेच्या टॉवरसाठी जमीन गेली. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन गेल्यानंतर जेमतेम ४ एकर जमीन शिल्लक राहील. आमच्या भागातील शेतरस्त्याची अवस्था बिकट आहे. शेतीमाल वाहतूक करता येत नाही. शेतकरी स्वखर्चाने रस्ते करतात. या द्रुतगती महामार्गापैक्षा शेतरस्ते, गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे करावीत.
- प्रदीप गावंडे, शेतकरी, डोंगरकडा, ता.कळमनुरी, जि.हिंगोली.
आमच्या कुटुंबाची ३२ पैकी २५ एकर जमीन शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित केल्यानंतर अल्प क्षेत्र शिल्लक राहील. मावेजा खूप कमी आहे. त्यातून इतर ठिकाणी जमीन खरेदी करणे शक्य होणार नाही. हा महामार्ग उंच असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा उपयोग नाही. सध्याच्या परभणी- गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण करावे. त्याचेच नामकरण शक्तिपीठ केल्यास सर्वच प्रश्‍न सुटतील.
- दत्ता वाघ, शेतकरी, पोखर्णी नृसिंह, जि.परभणी.
शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित केली जाणारी नांदेड जिल्ह्यातील जमीन सुपीक आहे. अर्धा एकर ते एक एकर जमीनधारक शेतकरी यामुळे भूमिहीन होतील. मावेजाचे दर रेडीरेकनर दराच्या दुपटीहून कमी तर बाजारभावाच्या अर्धेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर ठिकाणी जमीन घेणे शक्य होणार नाही. सामाजिक, आर्थिक समतोल बिघडून जाईल. या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविले आहेत.
- हनुमंत राजेगोरे पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नांदेड,
सरकारने शक्तिपीठ महामार्ग जात असलेल्या भागातील शेतकऱ्यांची मते जाणून घ्यायला हवी होती. परंतु तसे न केल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा महामार्ग ओलांडून शेती कसणे कठीण होणार आहे. त्यामुळे आमच्या गावातील शेतकरी एकत्र येऊन या महामार्गबाबत हरकती नोंदवत आहेत.
- कृषिभूषण भगवान इंगोले, मालेगाव, ता.अर्धापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com