
Indian Agriculture : मी शेतात राहातो. प्रसंगी सर्व प्रकारचे शारीरिक कष्ट करतो. शेतीतील प्रश्नांवर, निसर्गावर सतत लिहितो. त्या लेखनाला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळतो. पण साध्या साध्या व्यावहारिक विषयांकडं माझं अजिबात लक्ष नसतं. मन आवडीच्या विविध विषयात गुंतलेलं असतं. त्यामुळं बघणाऱ्याला मी समोर दिसतो पण असतो कुठल्या तरी वेगळ्याच जगात. टी.व्ही आणि वृत्तपत्र बघत नाही. एकाही व्हाट्सएप ग्रुपवर नाही. फक्त फेसबुकवर अधूनमधून असतो. त्यामुळं जगात काय चाललयं याची फार थोडी माहिती असते. बस प्रवासात बरचसं कळतं.
बँक व सरकारी कार्यालयात जायचा मनापासून कंटाळा. लातूरात सहकारीच हे काम करीत. इथं रुद्रा हटला आल्यापासून बँक, तलाठी कार्यालय, सोसायटी अशा ठिकाणी महिन्यात एखाद्या वेळी जावं लागतं. फेसबुकवरही शेतीविषयक योजना, अनुदान वगैरे बातम्या मी बघत नाही. ई-पिक पेरा नोंदीच्या जाहिराती दिसतात पण त्याही गांभीर्याने बघितल्या नाहीत. गतवर्षी ई-पिक नोंद केली नव्हती.यावर्षी अंबाजोगाईच्या सुरेश पाटील या मित्रांने खुपच पाठपुरावा केल्याने, नरेशला घेऊन ई-पिक पेरा नोंदी केल्या. आमच्या सहा खातेदारांच्या नोंदी करायला चार तास लागले. अँपवर आमचे सर्वे नंबरच सापडेनात. शेवटी सगळ्यांची ई-पिक पेरा नोंदणी झाली. प्रत्येकाचे सक्सेफुल अशी नोंद आली. भयंकर वैतागलो होतो. तरीही पहिल्यांदा असं काही तरी केलं म्हणून खूषही झालो.
परवा गावच्या तलाठ्याकडं नरेशने जाऊन बघितलं. शासकीय अँपवर आमच्यापैकी एकाच्याही पिकाची नोंद झाली नव्हती. काल तलाठ्याकडं अर्ज करून दोघांची पिक पेरा नोंदणी केलीय. आणखी चौघांची राहिलीय. ई-केवायसी या प्रकाराचा तर ऊबग आलाय. गर्दीत, रांगेत मी कधीच थांबत नाही. भयंकर वाईट फील येतो. लातूरात दुपारी मित्र भेटला. तो बोलला, गतवर्षीचं सोयाबीनचं दहा हजार रूपयांचं अनुदान माझ्या खात्यावर जमा झालंय, तुमच्या? मी म्हटलं, नाही. तो बोलला, कृषी विभागाकडं तुम्ही संमतीपत्र दिलं का? मी म्हटलं, नाही. मला तसं कोणी बोललं नाही. तुम्ही गतवर्षी ई-पिक पेरा नोंदणी केली होती का? मी म्हटलं,नाही. तो बोलला, तुमच्या सगळ्या खातेदारांचे मिळून ४० हजार रूपये तरी बुडाले. मी सहज म्हटलं, बुडाले तर बुडाले. मित्र बोलला, इतक्या सहजपणे कसं काय घेताय. माहिती तर घ्या, काय करता येते ते.
मी म्हटलं, शिरूरला आलेल्या नवीन कृषी सहाय्यकाचा मोबाईल नंबर माझ्याकडं नाही. तलाठ्याचा नंबर काल घेतलाय. माझा कोणाशीही संपर्क नाही. कोणी मुद्दाम सांगितलं तरच मला या बाबी कळतात. हे काही कौतुक नाही पण माझं जगणंच असं आहे याला काय करणार? मित्र म्हणाला,तुमच्या अँग्रोवनमधील व फेसबुकवरील लेखनामुळं महाराष्ट्रातील कृषीमधील मोठमोठे अधिकारी ओळखतात, त्याचा उपयोग काय?
मी म्हटलं, लेखन वाचून अगदी कृषी संचालकांपर्यंतचे फोन मला आलेले आहेत. आजही येतात. लेखनाचं खूपजण कौतुक करतात, ओळखतात. म्हणून काय त्यांनी मला, ई-पिक पेरा नोंद केली की नाही, हे विचारावं की काय? दोष माझा आहे. अशा बाबी माझ्या लक्षातच राहात नाहीत. पिकविमाही कोणीतरी पाठपुरावा करतो म्हणून भरतो. मी पंतप्रधान सन्मान निधीही घेत नाही. का माहित नाही पण मला हे सगळे भिकार धंदे वाटतात. मला अशी काम करण्याची प्रेरणाच नाही. यामुळं अनुदान बुडाल्याचं मला दु:खं वगैरे वाटत नाही. 'ऊकळ चाटून दुकाळ हटतयं का?' ही म्हण माझ्या बालपणीचं मी ऐकलीय. नाही तरी शेतीतील तोटा वर्षानुवर्षे आनंदाने सहन करतोयचं की! अख्खं आयुष्य अशाच पद्धतीने मस्त आनंदी जगत आलोय. आता स्वभावात, जगण्यात कसला बदल करायचा आणि कशासाठी? तुला व्यवहार जमत नाही म्हणणाऱ्यांना मी नेहमी प्रतिप्रश्न करतो. मी कधी तसा दावा केलाय? दाखव मला!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.