
आंबा (Mango)
- फळधारणा अवस्था
- तयार आंबा फळांची काढणी देठासह चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला उन्हाची तीव्रता कमी असताना करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी काढणी झालेले आंबे लगेचच झाडाच्या सावलीमध्ये ठेवावेत.
- फळकुज या काढणीपश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी फळांची काढणी देठासह करावी. काढणीनंतर फळे पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट (०.०५ टक्का) ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात ५० अंश सेल्सिअस तापमानाला १० मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यानंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत.
- विद्यापीठाने शिफारस केलेल्या कोरूगेटेड फायबर बॉक्समध्ये फळांची पॅकिंग करावे. आंबा फळांची वाहतूक शक्यतो रात्रीच्या वेळी करावी.
- आंबा फळांचे पाऊस आणि फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहित फळे मिळविण्यासाठी, गोटी ते अंडाकृती आकाराच्या फळांना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २५ बाय २० सेंमी आकाराच्या कागदी किंवा वर्तमानपत्राच्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- आंबा फळांची गळ कमी करण्यासाठी आणि प्रत सुधारण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्का) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना साधारणत: १० ते १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.
- तापमानात वाढ संभवत असल्याने, फळगळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणे फळे सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे.
- फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी बागेमधील गळालेली फळे गोळा करून नष्ट करावीत. विद्यापीठाने शिफारस केलेले ‘रक्षक फळमाशी सापळे’ प्रति एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील अशा प्रकारे टांगावेत.
- नवीन लागवड केलेल्या कलमांना पहिली तीन वर्षे योग्य प्रमाणात पाणी देण्याची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून दोनदा, तर दुसऱ्या वर्षी १५ दिवसांतून दोनदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून २ वेळा प्रति कलम ३० लिटर पाणी द्यावे.
तसेच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
काजू
- फळधारणा
- तयार काजू बी काढणी पूर्ण करून घ्यावी. बी वाळविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
- सध्याच्या हवामानामध्ये काजू झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव खोड आणि उघड्या मुळांवर दिसून येण्याची शक्यता आहे. किडीच्या प्रादुर्भावासाठी खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडकिडीची कीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते.
खोडाला पडलेल्या छिद्रातून भुस्सा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुसा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावे. नियंत्रणासाठी खोडाची प्रादुर्भाव झालेली साल काढावी. तारेच्या हुकाने किडीला बाहेर काढून मारून टाकावे.
क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) १० मिलि किंवा फिप्रोनील ५ मिलि प्रति लिटर पाण्याचे द्रावण करावे. त्यानंतर ५ लिटर द्रावण प्रति झाड या प्रमाणात झाडाच्या बुंध्यालगतचा भाग चांगला भिजवावा. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झाल्यास त्याजागी बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी.
- झाडाची मुळे उघडी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. झाडाचा खोडालगतचा भाग नियमित स्वच्छ करावा.
- तापमानात वाढ संभवत असल्याने, फळधारणा झालेल्या काजू झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम याप्रमाणे द्यावे. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
नारळ
- फळधारणा
- नारळावरील एरिओफाइड कोळीच्या प्रादुर्भावामुळे फळाच्या देठाखालील भागात पांढरट, पिवळे, त्रिकोणी चट्टे दिसून येतात. नंतर हे चट्टे वाढत जाऊन त्रिकोणी आकाराचे होतात. प्रादुर्भित भागावरील फळांचे आवरण तडकते. परिणामी, नारळ लहान राहतात, लहान फळांची गळ होते.
किडीच्या नियंत्रणासाठी
अझाडिरॅक्टीन ७.५ मिलि समप्रमाणात पाण्यात मिसळून वर्षातून तीन वेळा (ऑक्टोबर- नोव्हेंबर, जानेवारी-फेब्रुवारी, एप्रिल-मे) मुळाद्वारे द्यावे. ही मात्रा दिल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत नारळ काढू नयेत.
याशिवाय नारळावर कडुनिंबयुक्त कीटकनाशक (१ टक्का) ४ मिलि प्रति लिटर पाण्यातून नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी सर्व तयार, तसेच कीडग्रस्त नारळ काढून घ्यावेत. पडलेली फळे, फुलोरा गोळा करून नष्ट करावीत.
- नारळाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी सोडणे पुरावे आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.
- नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपतात. त्यासाठी रोपांना वरून सावली करावी.
- नवीन लागवड केलेल्या ३ ते ४ वर्षे वयापर्यंतच्या माडांना ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- मोठ्या नारळ झाडाना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देताना, ४० लिटर पाणी प्रति दिन द्यावे.
- माडाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी माडाभोवती वाळलेल्या गवताचे १५ सेंमी जाडीचे आच्छादन करावे किंवा नारळाच्या सोंडणे पुरावेत. झावळ्यांचे आच्छादन करावे.
चिकू
- फुलोरा ते फळधारणा
- चिकू बागेतील कीडग्रस्त तसेच गळालेली फळे, पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. बागेत स्वच्छता राखावी. जेणेकरून किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
- चिकूवरील बी पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी, बागेतील कीडग्रस्त आणि गळालेली सर्व फळे, पालापाचोळा गोळा करून नष्ट करावा. बागेची स्वच्छता राखून बागेत पुरेसा सूर्यप्रकाश येईल असे पाहावे.
किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, नियंत्रणासाठी - (प्रमाण प्रति -लिटर)
प्रोफेनोफोस (५० टक्के प्रवाही) १५ मिलि किंवा
इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) ५ मिलि किंवा
डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १० मिलि
वरील कीटकनाशकांची आलटून-पालटून फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर पुढील दोन फवारण्या १ महिन्याच्या अंतराने कराव्यात.
संपर्क : ०२३५८- २८२३८७/ ८१४९४६७४०१, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.