
Agricultural Tips:
हवामान अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ता. ११ ते १३ मे रोजी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आकाश अंशत ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान व कमाल तापमान २३ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, अशी शक्यता वर्तवली आहे.
विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात दिनांक १४ मे ते २० मे दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या कालावधीत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३२.५ अंश सेल्सिअम राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान २४.३ अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे.
पावसाची शक्यता लक्षात घेऊन कापणी केलेले भात पीक उघड्या शेतात न ठेवता त्वरित मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवावे.
अवकाळी पावसादरम्यान भुईमूग पिकाची काढणी केली असता काढणीनंतर शेंगा वाळविण्याकरिता स्वच्छ सूर्यप्रकाश न मिळाल्याने शेंगांमध्ये खवटपणा येऊ शकतो. त्यामुळे शेंगदाण्याची प्रतखालावू शकते. भुईमूग पिकाची काढणी पावसाचा अंदाज घेऊन करण्यात यावी.
अवकाळी पावसापूर्वी बागेतील परिपक्व काजू बी व बोंडू काजू बियांची वेचणी करून घ्यावी. अन्यथा, या बिया पावसात भिजून काजू बियांची प्रत खालावू शकते.
सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे आंबा पिकामध्ये अपरिपक्व फळांची गळ होऊ शकते. काढणीस तयार झालेली आंबा फळे काढून घ्यावेत.
उन्हाळी भात
पक्वता अवस्था
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता लक्षात घेता पक्व भाताची कापणी करून घ्यावी. कापणी झालेली असल्यास मळणी करून भात सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावे. मळणी केलेले धान्य २ ते ३ उन्हे देऊन वाळवून सुरक्षित आणि कोरड्या जागी साठवावे.
उन्हाळी मूग
पक्वता अवस्था
तुरळक ठिकाणी असलेली पावसाची शक्यता लक्षात घेता उन्हाळी मूग पिकाच्या तयार किंवा पक्व शेंगांची काढणी करून घ्यावी. त्यानंतर शेंगा २ ते ३ उन्हे देऊन वाळवाव्यात. त्या काठीच्या झोडून दाणे वेगळे करून घ्यावेत. स्वच्छ केलेले मूगसुरक्षित आणि कोरड्या जागी साठवावेत.
खरीप भात
पूर्वमशागत
खरीप भात लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन उन्हात तापू द्यावी, यामुळे तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होईल.
लागवडीसाठी भात बियाण्यांची उपलब्धता करून घ्यावी.
नारळ फळधारणा
नवीन लागवड केल्यानंतर पहिली ३ ते ४ वर्षे उन्हाळ्यात दर ३ ते ४ दिवसांनी पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते १० दिवसातून एक वेळा पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या एका नारळाच्या झाडाची पाण्याची गरज प्रति दिन ४५ ते ६० लिटर असते. माडाच्या बुंध्याभोवती १ ते २ मीटर व्यासाचे किंवा चौरसाकृती आळे तयार करून पाणी द्यावे.
काजू
पक्वता ते काढणी
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता लक्षात घेता परिपक्व काजू बी व बोंडूची वेचणी करून बी बोंडूपासून वेगळे करून घ्यावेत. ते सुरक्षित ठिकाणी वाळवण्यासाठी ठेवावे.
दोन दिवसाआड परिपक्व काजू बी व बोंडूची वेचणी करून बी बोंडूपासून वेगळे करून घ्यावेत. असे काजू बी स्वच्छ पाण्याने धुवावेत. नंतर ते उन्हामध्ये ३ दिवस वाळवावेत. बियांची एकसारखी वाळवण होण्याकरिता दर २ तासांनी बियांची उलटापालट करावी.
तीन दिवस वाळवणीनंतर काजू बी थंड करून गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावेत. काजू बीची उगवण क्षमता तसेच गराची प्रत चांगली राखण्याकरिता बाजारपेठेमध्ये उपलब्ध प्लॅस्टिक खोळीमध्ये हवाबंद करावेत. नंतर गोणपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावे.
नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पंधरा दिवसाच्या अंतराने १५ लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी.
नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम देण्याची व्यवस्था करावी. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
हळद
पूर्वमशागत
हळद लागवड करावयाच्या जमिनीची पूर्वमशागत करण्यास सुरुवात करावी. यासाठी जमिनीची पहिली नांगरणी १८ ते २२ सें.मी. खोल करून जमीन १५ ते २० दिवस उन्हात तापून द्यावी. कीड, रोगाच्या सुप्तावस्था नष्ट करण्यास मदत होईल.
भाजीपाला
रोपवाटिकेची तयारी
पाण्याची उपलब्धता असल्यास खरीप हंगामासाठी वांगी, मिरची, टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिकाची रोपे तयार करून घेण्यासाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत.
जमिनीची नांगरणी करून ३ मी. लांब × १ मी. रुंद × १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावे. वांगी, मिरची, टोमॅटो पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोग प्रतिकारक जातींची निवड करावी. सातत्याने मर रोग येणाऱ्या शेतामध्ये फेरपालट करावी. तीन वर्षापर्यंत वांगी कुळातील पिके एकाच शेतात लावू नयेत.
भुईमूग
पक्वता अवस्था
पावसाची शक्यता लक्षात घेता भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी.
काढणीसाठी तयार झालेल्या भुईमुगाची पाने पिवळी होऊन गळू लागतात. शेंगा पक्व होताना शेंगांवरील शिरा स्पष्ट दिसतात. शेंगेच्या टरफलाच्या आतील साल काळसर दिसू लागते. दाणे पूर्ण भरले जाऊन शेंगदाण्यास योग्य रंग येतो.
आंबा
फळधारणा (अंडाकृती फळे ते काढणी)
तुरळक ठिकाणी असलेली पावसाची शक्यता लक्षात घेता तयार झालेल्या (चौदा आणे - ८० ते ८५ टक्के पक्वतेच्या) आंबा फळांची काढणी देठासह करून घ्यावी. ही काढणी उन्हाची तीव्रता कमी असताना करावी.
पावसामुळे आंबा फळावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन काळे डाग पडतात. काळे डाग वाढत जाऊन फळे पिकताना सडू शकतात. त्यामुळे आंबा काढणीकरीता १५ दिवस शिल्लक असतील, तर अशा ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
दमट वातावरणामुळे काढणी केलेल्या आंबा फळावर फळकुज या रोगाचे प्रमाण वाढू शकते. यामुळे काढणीनंतर फळांवर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसून फळे कुजतात. फळांचे मोठे नुकसान होते. या फळकुजच्या नियंत्रणासाठी फळे काढणीनंतर लगेचच उष्ण जलप्रक्रिया करावी. त्यासाठी फळे ५० अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून ठेवावीत. अशी फळे खोक्यात भरावीत अथवा पिकण्यासाठी आढीत ठेवावीत.
आंबा फळांची काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढते. आंबा फळे काढल्यानंतर लगेचच सावलीमध्ये ठेवावीत. आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. आंबा वाहतूक भरदिवसा उन्हामध्ये वाहनांच्या टपावरून करणे टाळावे.
आंबा फळावर फळमाशीचा प्रादूर्भाव दिसून येऊ शकतो. अशा बागेतील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाद्वारे शिफारशीत फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजूच्या फांद्यांवर लावावेत.
नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून एकदा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून एकदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून एकदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी द्यावे.
आंबा फळांचे फळमाशी व प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षणासाठी करण्यासाठी २५ × २० सें.मी. आकाराच्या कागदी/ वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे. देठांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना आवरण घातल्यास फळांचा आकार, वजन वाढते. फळे डागरहित मिळण्यास मदत होते.
नवीन लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफ सफाई करून घ्यावी. १० × १० मीटर अंतरावर व घन पद्धतीने लागवड करणार असाल तर ५ × ५ मीटर अंतरावर १ × १ × १ मीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. त्यात सुपीक माती, तीन ते चार घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण भरून ठेवावे.
डॉ. विजय मोरे (नोडल अधिकारी), ९४२२३७४००१
डॉ. सुजित देशमुख (तांत्रिक अधिकारी),
८१४९४६७४०१
(कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.