
Farming Techniques :
हवामान अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, कोकण विभागामध्ये गुरुवार ते रविवार (ता. १५ ते १९) या काळात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस), कोकण विभागात रविवार ते शनिवार (ता. १९ ते २५) दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, तर किमान तापमान सरासरीएवढे असण्याची शक्यता वर्तविण्यात येते.
रब्बी उन्हाळी भात
रोप अवस्था
भात रोपे पुनर्लागवडी योग्य (३५ ते ४० दिवसांची) झाली असल्यास, पुनर्लागवडीची कामे सुरू करावीत.
पुनर्लागवड करावयाच्या खाचरामध्ये चिखलणी करावी. चिखलणीच्या वेळेस युरिया ८७० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट ३१३० ग्रॅम आणि म्युरेट ऑफ पोटॅश ८४० ग्रॅम प्रति गुंठा या प्रमाणे खते मिसळावीत.
पुनर्लागवडीसाठी १२ ते १५ सें.मी. उंचीची पाच ते सहा पाने फुटलेली रोपे वापरावीत.
पुनर्लागवड २० बाय १५ सें.मी. अंतरावर करावी. एका चुडामध्ये दोन ते तीन रोपे लावावीत.
पहिल्या ३० दिवसांपर्यंत पाण्याची पातळी २.५ ते ५ सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी.
पांढरा कांदा
वाढीची अवस्था
पुनर्लागवडीयोग्य कांदा रोपांची लागवड करून घ्यावी.
लागवड गादीवाफ्यावर किंवा सरी वरंब्यावर ३० बाय १० सें.मी. अंतरावर करावी.
मशागतीच्या वेळी २५० ते ३०० किलो सेंद्रिय खते (शेणखत/कंपोस्ट/गांडूळखत) प्रति गुंठा प्रमाणे जमिनीत मिसळावीत.
लागवडीच्या वेळेस युरिया १ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट ३ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ८०० ग्रॅम या प्रमाणे प्रति गुंठा क्षेत्रावर रासायनिक खते मिसळावीत.
मर रोगापासून रोपांचे संरक्षण करण्याकरिता पुनर्लागवड करतेवेळी रोपे, ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात ५ मिनिटे बुडवून घ्यावीत. त्यानंतर कांदा रोपांची पुनर्लागवड करण्यास प्राधान्य द्यावे.
केळी
शाकीय वाढीची अवस्था
नवीन लागवड केलेल्या केळी बागेस नत्राची मात्रा (४०० ग्रॅम युरिया) लागवडीनंतर ६०, ९० आणि १२० दिवसांनी समप्रमाणात विभागून बांगडी पद्धतीने द्यावी. खतमात्रा ३० सें.मी. अंतरावर १० सें.मी. खोल आणि २० ते २५ सें.मी. रुंद चरात द्यावी.
थंडीत वाढ होत असल्याने केळीच्या झाडांची पाने पिवळी पडू लागतात. घडाची निर्मिती मंदावते. घडामधील फण्यांची व फळांची संख्या कमी होऊन आकार देखील लहान होतो. त्यामुळे घडाभोवती पाने गुंडाळावीत.
बागेस संध्याकाळच्या वेळेस पाणी देण्याची व्यवस्था करावी.
बागेत जागोजागी पालापाचोळा पेटवून धूर करावा, जेणेकरून बागेतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल.
हळद
पक्वता
हळदीचे गड्डे पक्के झाल्यावर हळदीची पाने पिवळी पडून सुकू लागतात आणि जमिनीवर लोळतात. या वेळी पक्व हळद कंदाची काढणी करावी. काढणी अगोदर जमिनीच्या मगदुरानुसार १५ दिवस ते १ महिना पिकास पाणी देणे बंद करावे. कंद व हळकुंडे वेगवेगळी करून घ्यावी. हळद शिजवून ताडपत्रीवर सिमेंट काँक्रीटच्या खळ्यावर वाळविण्यासाठी पसरून ठेवावी. हळद वाळविण्यासाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागतो.
कोबी
वाढीची अवस्था
कोबी लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी खुरपणी करून रोपांना मातीची भर द्यावी.
नत्र खताची दुसरी मात्रा ९०० ग्रॅम युरिया प्रति गुंठा देण्यात यावी.
कोबी पिकास आवश्यकतेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी.
हरभरा
वाढीची अवस्था
हरभरा पिकामध्ये पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे.
निंदणीच्या वेळेस हरभरा पिकाच्या रोपांचे शेंडे खुडून घ्यावेत. त्यामुळे फांद्यांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे एकूण पीक उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळते.
हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. या किडीच्या अळ्यामुळे पानांवर पांढरे डाग दिसून येतात. किडीची अळी शेंडे खाते. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. हरभऱ्यावरील घाटेअळी किडीच्या व्यवस्थापनासाठी पिकामध्ये एकरी दोन कामगंध सापळे लावालेत. तसेच शेतामध्ये एकरी दोन पक्षिथांबे लावावेत. जेणेकरून प्रभावी कीड नियंत्रण होण्यास मदत मिळेल.
डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१
(नोडल अधिकारी, कृषी विद्या विभाग,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.