
Pune News : राज्यातील कृषी पदवीधरांसाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी ‘नागरी सहकारी पतसंस्था’ सुरू करण्यास शासनाच्या सहकार विभागाने १४ ऑगस्ट रोजी अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच या संस्थेची पहिली मुख्य शाखा पुण्यात सुरू होणार असून संस्थेमार्फत सभासदांसाठी, पाल्यांसाठी लवकरच कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत.
राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते कृषी पदवीधर असलेले आणि ‘यशदा’चे उपमहासंचालक शेखर गायकवाड यांनी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र बुधवारी (ता.१४) स्वीकारले. या वेळी सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, उपनिबंधक मिलिंद सोबले, ॲग्रीकॉस कृषी विद्यापीठ पदवीधर संघाचे अध्यक्ष अॅड अनंत चोंदे पाटील, माजी कृषी सहसंचालक दादाराम सप्रे, पीएमसीचे माजी सहआयुक्त यशवंत खैरे, विश्वेश्वर सहकारी बँकेचे माजी सर व्यवस्थापक रवींद्र पवार, ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले, उद्योजक डॉ. गोविंदराज भागानगरे, नामदेव चिंतामण, कृषी विभागाचे मुख्य सांख्यिकी वैभव तांबे, सहायक निबंधक नवनाथ अनपट भोसले आदी उपस्थित होते.
कृषी पदवीधर असलेले आणि राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून कृषी पदवीधरांची राज्यस्तरीय नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी शासनाने १३ ऑक्टोबर २०२३ च्या आदेशान्वये संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असणारी कृषी पदवीधरांची नियोजित सहकारी पतसंस्था नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली होती.
या मान्यतेच्या आधारे सहकार आयुक्त कार्यालयातील पतसंस्था विभागाचे अपर निबंधक यांनी २ नोव्हेंबर २०२३ च्या पत्राद्वारे पतसंस्था नोंदणीच्या अनुषंगाने ‘अॅग्रीकॉस क्रेडिट सोसायटी लिमिटेड’ शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडण्यासाठी मान्यता दिली होती. त्यानंतर पतसंस्थेच्या सभासद नोंदणीस सुरुवात झाली होती. नोंदणीच्या वेळी किमान तीन हजार सभासद करणे आवश्यक होते. तर ६० लाख रुपयांचे भागभांडवल अपेक्षित होते.
राज्यातील सर्व कृषी पदवीधरांच्या पहिल्या ‘अॅग्रीकॉस स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे’ या नावाने राज्यस्तरीय सहकारी पतसंस्थेची क्र. एचओ/पीएनए/आरएसआर/सीआर -०१/२०२४ या क्रमांकाने नोंदणी करण्यात आली आहे. चारही कृषी विद्यापीठांतील सर्व कृषी पदवीधरांना जोडणाऱ्या व त्यांचे आर्थिक पायावर आधारलेले संघटन अधिक मजबूत करण्यासाठी या पतसंस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यस्तरीय पतसंस्थेचे सर्व निकष पूर्ण करून ३३४५ सभासदांची यादी सहकार आयुक्तालयास नोंदणीसाठी सादर करण्यात आली होती. या पुढे देखील सभासद संख्या वाढविण्यात येणार आहे.
राज्यातील या पहिल्या राज्यस्तरीय पतसंस्थेच्या मान्यतेसाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल प्रवर्तकांनी कृतज्ञता व्यक्ती केली आहे. तसेच कृषी पदवीधर असलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले आहेत. पतसंस्थेच्या नोंदणीसाठी व निकष पूर्ण करताना केलेल्या सहकार्याबद्दल शेखर गायकवाड यांनी आभार मानले.
संस्थेचे सभासदत्व पूर्णतः ऐच्छिक असून, त्यासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येणार नाही. सध्या विविध जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सभासद देखील या संस्थेचे सभासद होऊ शकतात. भविष्यात, प्रत्येक कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजेच राहुरी, परभणी, अकोला, दापोली अशा काही ठिकाणी तसेच निवडक जिल्ह्यांच्या ठिकाणी शाखा सुरू करण्यात येणार आहेत.
संस्थेचा उद्देश :
- राज्यातील कृषी पदवीधरांना आर्थिक पायावर आधारित एका छताखाली आणणे.
- कृषी पदवीधरांसाठी धोरणात्मक निर्णय राबविण्यास मदत करणे.
- ज्या कृषी पदवीधरांना स्वतःचा लघू उद्योग, व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.