
Solapur News : रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर कमी करून पौष्टिक अन्न निर्माण करावे लागणार आहे. सध्या कॅन्सर, नपुंसकत्व, ताणतणाव इत्यादी बाबी नित्याच्याच झाल्या आहेत.
भविष्यात आरोग्याच्यादृष्टीने उत्पन्नवाढीकडे लक्ष देताना पर्यावरण पूरक शेतीपद्धतीचा अवलंब करण्याची गरज वाढणार आहे, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे यांनी व्यक्त केले.
कुरूनूर (ता. अक्कलकोट) येथे आयोजित पीक परिसंवादात ते बोलत होते. या ऊस पीक परिसंवादाचे आयोजन रामचंद्र पाटील ऍग्रो प्रोड्युसर कंपनीने केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्य प्रदेश सरकारचे वित्तसचिव ज्ञानेश्वर पाटील होते.
या कार्यक्रमाला यशस्विनी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा सौ. अनिता माळगे, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रदीप गोंजारी, गोंजारी, अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष अमर पाटील उपस्थित होते.
डॉ. तांबडे म्हणाले, की उसासारख्या पिकात पाचट व्यवस्थापन करून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे आवश्यक आहे. तसेच ऊस पिकामध्ये असिटोबॅक्टरचा वापर करावा व युरिया वापराचे प्रमाण ५० टक्के कमी करावे. सध्या नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला भरपूर वाव आहे. तसेच नागरिक सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने सजग झाले आहेत.
या संधीचा वापर शेतकरी बांधवांनी करावा, असेही ते म्हणाले. ज्ञानेश्वर पाटील यांनी शेतकरी बांधवांनी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन कृषी विज्ञान केंद्राच्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे सांगितले. सौ. अनिता माळगे यांनी यशस्विनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची यशोगाथा लोकांसमोर मांडली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.