
शेतकरी ः अक्षय सुर्याजी पवार
गाव ः खांबाळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
एकूण क्षेत्र ः १२ एकर
काजू लागवड ः ४ एकर
एकूण झाडे ः ३००
खांबाळे (ता. वैभववाडी) येथे अक्षय पवार यांची १२ एकर शेतजमीन आहे. त्यापैकी ४ एकरांत काजूच्या ३०० झाडांची २०१८ मध्ये लागवड केली आहे. त्यात प्रामुख्याने वेंगुर्ला-७ जातीची २५० तर वेंगुर्ला ४ ची ५० झाडे आहेत. साधारण १ एकरांत भात शेती केली जाते.
नियोजनातील बाबी ः
- यंदाचा काजू हंगाम फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापासून सुरू झाला होता. या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काजू हंगाम सुरू होता.
- झाडावरून पडलेले काजू बी गोळा केले. आठवडाभर बागेतून काजू बी गोळा करण्याचे काम सुरु होते. त्यानंतर काजू स्वच्छ धुवून कोवळे उन्ह देऊन त्यांची साठवणूक करून ठेवले. काजू बी गोळा झाल्यानंतर अपेक्षित साठा झाल्यानंतर त्यांची विक्री केली.
- हंगाम संपल्यानंतर बागेमध्ये झाडांखाली पडलेला पालापाचोळा आणि त्याखाली पडलेले काजू एकत्र केले. पालापाचोळा एकत्र करून झाडाच्या बुंध्यावर रचून ठेवला. त्यामुळे झाडांना सेंद्रिय घटकांची उपलब्धता होते, शिवाय तणांचा प्रादुर्भाव काही अंशी कमी होतो.
- या वर्षी मॉन्सूनचे आगमन दरवर्षीच्या तुलनेत उशिराने झाली आहे. दरवर्षीच्या नियोजनानुसार जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात झाडांना खतमात्रा दिली जाते. मात्र यंदा खत मात्रा नियोजित वेळेत देता आली नाही.
- जुलै महिन्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे पूर्ण जुलै महिन्यात बागेत कोणतीही कामे करता आली नाहीत. खतमात्रा देखील उशिराने द्यावी लागली.
- ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झाडांना सरळ पद्धतीने रासायनिक खतमात्रा दिल्या. पोटॅश, फॉस्फेट आणि युरिया यांच्या मात्रा झाडांना देण्यात आल्या. झाडाच्या आकार आणि वयानुसार दीड ते दोन किलोपर्यत रासायनिक खतमात्रा दिल्या जातात.
मागील महिनाभरातील कामकाज ः
- मागील दोन महिन्यांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे बागेत मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. मागील काही दिवसांपासून पावसात काहीशी उघडीप होती. त्यामुळे तण नियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी सुरू आहे. सध्या तणनाशक फवारणीचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे.
- तणनाशक फवारणी करताना झाडाच्या फांद्यापासून ३ ते ४ फूट अंतर लांब ठेवून तणनाशक फवारणी केली जाते. तसेच फवारणीवेळी वाऱ्याची दिशा आणि वेग या बाबीही विचारात घेतल्या जातात.
आगामी नियोजन ः
- तणनाशक फवारणीचे कामकाज पुढील आठवडाभरात पूर्ण होईल.
- सप्टेंबर महिन्यात बागेत शिल्लक राहिलेले आणि उगवलेले तण मजुरांच्या मदतीने पुन्हा काढले जाईल. बागेत वाढलेली आणि बांधावरील झाडे-झुडुपे काढून बागेची साफसफाई केली जाईल.
- ऑक्टोबर महिन्यात झाडांना पालवी येण्यास सुरुवात होते. या काळात टी मॉस्किटो बग किडीचा प्रादुर्भाव हमखास जाणवतो. किडीच्या प्रादुर्भावासाठी बागेचे सातत्याने निरिक्षण केले जाईल. प्रादुर्भाव आढळून आल्यास, दापोली कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी केली जाईल. दरवर्षी साधारण ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात कीटकनाशक फवारणी केली जाते.
- नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये काजूला मोहोर फुटण्यास प्रारंभ होतो. मोहोर येण्याच्या काळात फुलकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. फुलकिड्यांच्या प्रादुर्भावासाठी बागेचे सतत निरिक्षण केले जाईल. बाग पूर्ण मोहरल्यानंतर प्रादुर्भाव पाहून कीटकनाशकांची फवारणी घेतली जाईल.
- जानेवारी महिन्यात ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि धुक्याचे प्रमाण वाढल्यास बुरशीजन्य रोग आणि फुलकिडींचा
प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अतिरिक्त रासायनिक फवारणी घेतली जाते. फेब्रुवारी महिन्यापासून काजू हंगामाला सुरुवात होते. या वर्षीचे हवामान पाहता काजू
हंगाम सुरु होण्याचा अंदाज बांधणे शक्य नाही.
------------------
- अक्षय पवार, ८३६९४२०६७६
(शब्दांकन ः एकनाथ पवार)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.