Pune News : उत्तराखंडच्या जंगलातील आग सोमवारीही (ता.०६) धगधगत आहे. काही ठिकाणी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरिही या आगीत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय हवाई दलाचीही मदत घेण्यात आली असून गेल्या वर्षी १ नोव्हेंबरपासून राज्यात आगीच्या ९१० घटना घडल्या आहेत. यामुळे सुमारे ११४५ हेक्टर जंगल बाधित झाले आहे. देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड सध्या धगधगते उत्तराखंड म्हणून पुढे येत आहे. यावरून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रविवारी (ता.०५) मुख्य सचिव राधा रतुरी यांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश जारी करण्यास सांगितले असून आठवडाभर दररोज जंगलातील आगीवर नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचबरोबर जंगलात आग लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या चौघांविरुद्ध आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तराखंडमधील जंगलातील आग भीषण रूप घेत असून रविवारी अल्मोडा येथील दुनागिरी मंदिराला आग लागली. तसेच बेतालघाटातील जंगलांना आग लागल्याने वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे. जोग्याडी गावातील जंगलात लागलेल्या आगीत जर्दाळू आणि मनुका बागा जळून खाक झाल्या. यामुळे जर्दाळू आणि मनुका यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान पौरी जिल्ह्यातील जंगलात लागलेल्या आगीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. पौडीच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, पौरी तहसिलच्या थापली गावातील जंगलातील आग शेतात पोहोचली. यावेळी शेतात ठेवलेले गवत वाचवण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिला होरपळून मृत्यू झाला. सावित्री देवी असे त्या महिलेचे नाव असून ऋषिकेश येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे तिचा उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला.
राज्यात फैलावत जाणाऱ्या आगीच्या घटनांमुळे मुख्यमंत्री धामी यांनी रविवारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी, वनसंपदा ही आमची वारसा आहे आणि ती कोणत्याही किंमतीत जपायची आहे. यामुळे अधिकाऱ्यांना आपापसात समन्वय निर्माण करून आगीवर नियंत्रण आणणारी यंत्रणा निर्माण करण्यास सांगितले आहे. तसेच शक्य तितक्या लवकर आगीवर नियंत्रित मिळवून राज्यातील जंगल वाचवण्यासाठी सर्व जनतेने पूर्ण सहकार्य करावे असेही आवाहनही त्यांनी केले आहे.
तसेच राज्यातील जंगलात आग वाढत असून त्यावर लक्ष ठेवत आग विझवण्यासाठी प्रयत्न करा. एका आठवड्यासाठी सर्व प्रकारचा चारा जाळण्यावर तातडीने बंदी घालण्यासह शहरी संस्थांना घनकचरा जंगलात किंवा जवळ जाळण्यास बंदी घालावी असेही आदेश रतुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री धामी यांनी दिले आहेत.
आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
जंगलाला लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात अलीकडील मृत्यू नेपाळी वंशाच्या २८ वर्षीय महिला मजुराचा होता. तीन दिवसांपूर्वी अल्मोडा जिल्ह्यातील पाइन राळ कारखान्याजवळील जंगलातील आग विझवण्याच्या प्रयत्नात पूजा नामाक २८ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली होती. तिचा शनिवारी मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात त्याच आगीशी लढताना तिचा नवरा आणि इतर दोघांचा मृत्यू झाला होता.
२४ तासांत २४ घटनांची नोंद
अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक निशांत वर्मा यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत ३६.५ हेक्टर वनजमिनीत आग पसरण्याच्या २४ घटनांची नोंद झाली आहे. यात एकट्या कुमाऊं विभागातील २२ घटनांचा समावेश आहे. वर्मा म्हणाले की, गेल्या महिन्यात नैनिताल शहराजवळ भीषण आग लागली होती. यानंतर भारतीय हवाई दलाला आग विझवण्याच्या कामात आणले गेले. नैनिताल, हल्दवानी आणि रामनगर वनविभागातील काही भागांतील वनक्षेत्र सर्वाधिक प्रभावित झाले. यापैकी काही भागात एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या मदतीने आग विझवण्यात आली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.