
Book Review : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाविषयी लिहिल्या गेलेल्या पुस्तकामध्ये ‘गावगाडा’ हे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे. ब्रिटिशांच्या नोकरीमध्ये कार्यरत असलेल्या त्रिंबक नारायण आत्रे यांनी लिहून हे पुस्तक स्वतःच १९१५ मध्ये प्रकाशित केले होते. त्याला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याची शताब्दी आवृत्ती डॉ. द. दि. पुंडे यांच्या साक्षेपी संपादनाखाली आली. त्यांची ६२ पानांची प्रस्तावना अत्यंत मोलाची आहे. आत्रे यांच्या ग्रंथाचे उपशीर्षक हे ‘Notes on Rural Sociology with Special Reference to Agriculture’ असे होते.
खरोखरच ग्रामव्यवस्थेचे सूक्ष्म विश्लेषण करून त्यातील घटकांचे परस्परांशी असलेले संबंध आत्रे ‘गावगाडा’मध्ये मांडतात. त्यांची विचारपद्धती समाजशास्त्रीय आणि काटेकोर असून, विचाराचे केंद्र शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणीभोवती फिरते. त्याच दरम्यान ‘गावगाडा शतकानंतर..’ (२०१२) हे अनिल पाटील (सुर्डीकर) यांचे, तर उल्का महाजन यांचे ‘कोसळता गावगाडा’ (२०१५) अशी दोन पुस्तकेही आली होती. मात्र ब्रिटिशांच्या काळानंतर इतकी वर्षे उलटून गेल्यानंतर ग्रामीण भागामध्ये नेमके काय बदल घडले, याविषयी फारसे लिहिलेच गेले नाही.
या पार्श्वभूमीवर शेखर गायकवाड यांच्या बदलता ग्रामीण महाराष्ट्र या पुस्तकाकडे पाहावे लागते. तेही आत्रे यांच्या प्रमाणे सरकारी अधिकारी, त्यातही कृषी विभाग, भूजल संचालक ते महाराष्ट्राच्या साखर आयुक्तांपर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषविणारे सनदी अधिकारी आहेत. अशा प्रशासनातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पदावर पोहोचल्यावर जमिनीशी असलेला संदर्भ आणि संपर्क तुटत जाण्याची शक्यता असते. आपल्या लहानपणाच्या काळावर अवलंबून नॉस्टॅल्जिक लिहिले जाण्याचा धोका असतो. तो टाळत देशामध्ये तुलनेने प्रगत मानल्या गेलेल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये स्वातंत्र्यानंतर नेमके कोणते बदल होत गेले, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या ‘अॅग्रोवन’मधील सदरातून केला.
या जगामध्ये कोणतीही गोष्ट स्थिर नसते, त्यात बदल होत जाणे अपेक्षितच असते. हे खरे असले तरी पारंपरिक जमीन धारणा पद्धती, पूर्वीच्या महसूल पद्धती, गावातील केंद्रीय पातळीचे प्रतिनिधित्व करणारे पोस्ट खाते, नोकरशाहीमध्ये होत गेलेले बदल हे इतक्या वेगाने होत गेले की अनेकांची या वेगाशी जुळवून घेताना दमछाक झाली. ब्रिटिशपूर्व काळापासून स्वयंभू असलेले गाव. त्याचा कणा असलेला शेतकरी वर्ग आणि शेती कामाशी जोडलेले गेलेले बलुतेदार, अलुतेदार यांच्या एकमेकाशी असलेल्या भल्याबुऱ्या संबंधाचा ताणाबाणा जपत गाव उभे होते.
या गावकुसामध्ये येणाऱ्या भटक्यांचे एक वेगळेच जग होते. मात्र स्वातंत्र्यानंतर त्यात प्रचंड वेगाने बदल झाले. वाटण्या होत शेतांचा आकार कमी होत गेला, घरे दुभंगत विभक्त होत लहान होत गेली. पाच- पाच दिवस चालणारे विवाह सोहळे एकाच दिवसात, तेही शहरातील कार्यालयामध्ये जाऊन करण्यापर्यंत सामान्यांची पोहोच गेली. केवळ विवाह पद्धतीच बदलली असे नव्हे, तर नात्यांचे पदरही बदलत गेले. शिक्षणाचे वारे विविध शिक्षण महर्षींनी ग्रामीण भागापर्यंत पोहोचविल्यामुळे शिकवलेला म्हणून स्वतः संपूर्ण स्वतंत्र समजणारा समाज तयार होत गेला.
पूर्वीप्रमाणे एकत्र येत साजरे केलेले सणवार, धार्मिक संस्थावरील अवलंबित्व यांचे प्रमाण घटत गेले. आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी शेतकरी आपला माल विकायचा, येताना स्वतःच्या कुटुंबाच्या गरजेच्या वस्तू विकत घेऊन यायचा. अशा आठवड्यातून एकदा बाजारात जाणाऱ्या लोकांकडून आता घरबसल्या ऑनलाइन खरेदी सुरू झाली आहे. या बाजारहाट ते बिग बास्केटपर्यंतच्या बदलाचा आढावा शेखर गायकवाड आपल्या हलक्या फुलक्या शैलीत घेतात. अगदी स्मशानभूमीमध्ये गेल्या १०० वर्षांत कसे बदल होत गेले, हे ते सांगतात.
गावाची वेस, आत आल्यानंतरचे मध्यवर्ती केंद्र असलेली चावडी, गावातील घरांची रचना व त्यांचे वेगवेगळे प्रकार आणि स्वभाव माणसांप्रमाणे बदलत गेले. विकास योजना राबविण्यातील महत्त्वाचा घटक असलेली दारीद्र्यरेषा बदलत गेलेली असली तरी आजही तितकीच महत्त्वाची असते. गाव व त्यातील संस्था बदलत गेल्या, गावातील माणसेही बदलत गेली. लहानपणीच्या आठवणीच्या उमाळ्यावर जगण्यापेक्षा आजचे प्रखर वास्तव स्वीकारून गावामध्ये शिरायला हवे, हे शेखर गायकवाड यांच्या संपूर्ण लेखनाचे सूत्र आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.