Dairy Business : कुटुंबाच्या साथीने केला यशस्वी दुग्धव्यवसाय

Article by Rajkumar Chaugule : कोल्‍हापूर जिल्ह्यातील धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील रमेश आण्णा लंगरे यांनी गेल्या चोवीस वर्षांपासून गोठा व्यवसाय यशस्वी करून दुग्धव्‍यवसायात स्थिरता मिळवली आहे.
Animal
Animal Agrowon

शेतकरी नियोजन : पशुपालन

शेतकरी : रमेश आण्णा लंगरे

गाव : धरणगुत्ती ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

एकूण शेती : साडेचार एकर

एकूण जनावरे : ५५

कोल्‍हापूर जिल्ह्यातील धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील रमेश आण्णा लंगरे यांनी गेल्या चोवीस वर्षांपासून गोठा व्यवसाय यशस्वी करून दुग्धव्‍यवसायात स्थिरता मिळवली आहे. कुटुंबाच्या एकत्रित कष्टाने दुग्धव्यवसाय फुलविला आहे. रमेशराव यांना पत्नी व मुलांची खंबीर साथ मिळते आहे.

वीस वर्षांपूर्वी रमेश लंगरे हे इचलकरंजी येथील एका कारखान्यामध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी करत होते. त्यावेळी त्यांच्याकडे ४ म्हैशी व २ गायी होत्या. नोकरीतील श्रम, तिथे मिळणारा पगार यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मोठी कसरत त्यांना करावी लागत असे.

याउलट गोठ्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होत होती. यामुळे त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ दुग्धव्यवसायाकडे लक्ष देण्याचे ठरविले. त्यांची साडेचार एकर शेती आहे. त्यात दोन एकर क्षेत्रावर चारा पिके तर अडीच एकरांवर ऊस लागवड आहे. याशिवाय त्यांनी भागीदारीवर दीड एकर शेतजमीन घेतली आहे. उसाचे एकरी सरासरी ६० टनांपर्यंत उत्पादन ते घेत आहेत.

धरणगुत्तीतील माळभाग येथे रमेश यांनी गोठा उभारला आहे. या गोठ्यामध्येच ते सहकुटुंब राहतात. व्यवसायासाठी पत्नी सौ. सविता, मुलगा ओंकार व स्‍वप्नील यांची मदत त्यांना मिळते. कोणताही मजूर न ठेवता घरातील सदस्यांच्या पाठबळावर दुग्धव्यवयायात त्यांनी प्रगती केली आहे.

Animal
Animal Management : आधुनिक पशू व्यवस्थापन हेच डेन्मार्कचे सूत्र

असा आहे दुग्धव्यवसाय :

साधारण आठ गुंठे क्षेत्रामध्ये तीन भागांत गोठ्याचे बांधकाम केले आहे. संपूर्ण गोठा बंदीस्त पद्धतीचा आहे.

दोन जनावरांपासून सुरु केलेला दुग्ध व्यवसाय आज ५५ जनावरांपर्यंत पोचला आहे. विशेष म्हणजे सर्व जनावरे घरीच तयार केली आहेत.

सध्या गोठ्यात लहान मोठी मिळून ५५ जनावरे आहेत. त्यात म्हैसाना जातीच्या १६ म्हशी, २६ एचएफ गाई आणि ७ वासरे आहेत.

गोठ्यातील जनावरांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता लसीकरणावर विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे गोठ्यातील जनावरे आजारी पडण्याची संख्या कमी झाली आहे.

दररोज सकाळी साडेपाच वाजता गोठ्यातील कामांना सुरुवात होते. सुरुवातीला गोठ्याची स्वच्छता केली जाते. त्यानंतर दूध काढणी केली जाते. गाईंचे दूध काढणासाठी यंत्राचा वापर केला जातो. तर म्हशींच्या धारा हाताने काढल्या जातात.

चारा नियोजन :

जनावरांना संतुलित आणि उत्तम दर्जाचा चारा उपलब्ध होण्यासाठी दोन एकरांत चारा पिकांची लागवड केली आहे. त्यात मका व हत्तीघास गवताची लागवड आहे.

जनावरांना चाऱ्याची कुट्टी करून दिलीजाते.

जनावरांच्या चाऱ्यासाठी स्वतःच्या शेतात नियोजन केले असले तरी वर्षभर हा चारा पुरेसा होत नाही. त्यामुळे बाहेरून चारा विकत आणला जातो. विशेषकरून

पक्व झालेला ऊस चाऱ्यासाठी घेतला जातो. साधारणतः ३००० रुपये टनापर्यंत उस विकत घेतला जातो. १५ कांड्या तयार झालेला ऊस ते विकत घेतात.

ऊस, हत्तीघास, मका यांची कुट्टी करून जनावरांना दिली जाते. त्यामुळे जनावरांना संतुलित चारा उपलब्ध होतो. हा चारा बारमाही उपलब्ध कसा होईल याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होत नाही.

खाद्यामध्ये गहू, भुसा, गोळी पेंड आदींचा समावेश देखील कला जातो.

याशिवाय दर महिन्याला सुमारे ९० पोती पशुखाद्य जनावरांना दिले जाते. पशुखाद्याची खरेदी थेट कंपनीतून करण्यावर भर दिला जातो.

प्रति जनावर प्रतिदिन सुमारे २५ किलो चाराकुट्टी दुधाच्या प्रमाणानुसार जनावरांना दिली जाते. साधारण १८ लिटर दूध देणाऱ्या जनावराला ६ किलो खाद्य दिले जाते.

लहान वासरांना काल्फ स्टार्टर दिले जाते. नवजात वासरांना सुरुवातीच्या काळात पुरेशा प्रमाणात दुधही पाजले जाते.

Animal
Animal Care : पाळीव प्राण्यांमधील उष्माघात टाळा

लहान वासरांचे संगोपन :

या गोठ्याचे वैशिष्ठ्य म्हणजे लंगरे कुटुंबियांनी घरीच सर्व जनावरांची पैदास केली आहे. संपूर्ण लंगरे कुटुंब दिवसभर गोठ्यात असल्याने प्रत्येक जनावरांवर वैयक्तिक लक्ष असते.

जनावरांच्या नावानुसार जनावरांची गाभण तारीख, व्यायलेली तारीख नोंद केली जाते. कोणत्याही परिस्थितीत भाकड काळ वाढून गोठ्यातील दूध उत्पादन कमी येऊ नये यासाठी भाकड जनावरे व दूध देणाऱ्या जनावरांचे संतुलन राखले जाते.

गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर दूध देत असतानाच ठराविक दिवसांनी येणारा माजाचा कालावधी लक्षात घेऊन रेतन केले जाते. शक्यतोकरून तिसऱ्या माजाला रेतन करण्याचा त्‍यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे जनावरांचा भाकड काळ कमी होऊन दुधाचे निरंतक ठराविक प्रमाणात राहत असल्याचे लगंरे कुटुंबिय सांगतात.

गोठ्यातील कोणत्याही लहान मोठ्या जनावराची विक्री केली जात नाही. याउलट अनेक शेतकरी लहान वासरे संगोपनासाठी घेऊन जातात.

उन्हाळ्यातील व्यवस्थापन :

ऋतुनुसार जनावरांच्या आहार आणि पाणी व्यस्‍थापनामध्ये आवश्यक ते बदल केले जातात.

उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वी जनावरांना तीन वेळा पाणी पाजले जाते. जेणेकरून उष्णतेमुळे जनावरांवर शारिरीक ताण येणार नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक जनावरांमागे दूध उत्पादनात एक ते दोन लिटर घट दिसून येते. दूध उत्पादनात कमीत कमी घट व्‍हावी यासाठी जनावरांना कोरड्या चाऱ्यापेक्षा हिरवा चारा देण्यावर अधिक भर दिला जातो. विशेषतः मका, हिरव्या गवताच्या वापरावर अधिक भर दिला जातो. उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास गोठ्याभोवती कापडाचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडले जाते. जेणेकरून गोठ्यात गारवा निर्माण होईल.

रमेश लंगरे, ९५६११८५७४०

(शब्दांकनः राजकुमार चौगुले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com