Bamboo Farming: शेताच्या बांधावर बांबू लागवडीचे धोरण हवे
नागपूर ः शेताच्या बांधावर बांबू (लागवड केल्यास त्याची झपाट्याने वाढ होते. शिवाय, त्याच्यापासून तयार होणारा कचरा शेतात पडल्यामुळे मातीला खत मिळते व तिची सुपीकता वाढते. त्यामुळे शेताच्या बांधावर बांबू लागवड करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने करावा, असे आवाहन वरिष्ठ वैज्ञानिक व कृषी वनशेती संशोधन केंद्राचे डॉ. विजय इलोरकर यांनी केले.
बांबू सोसायटी ऑफ इंडिया विदर्भ चॅप्टर (महाराष्ट्र चॅप्टर) तर्फे धनवटे सभागृहातील ‘बांबू लागवड’ विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी सीएसआयआर निरी वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. लाल सिंह, बांबू सोसायटी ऑफ इंडिया विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष अजय पाटील, सुनील जोशी, कार्यकारी संचालक आशीष नागपूरकर उपस्थित होते.
डॉ. विजय इलोरकर म्हणाले, ब्लॉक, बाउंडरी व ॲग्रोफॉरेस्ट्री अशा तीन प्रकारांत बांबूची शेतीमध्ये लागवड केली जाऊ शकते. याशिवाय, पडीक जमिनीवर बांबूची लागवड करता येते. ॲग्रोफॉरेस्ट्रीमध्ये सात ते आठ वर्षांत दोन पिकेदेखील घेतली जाऊ शकतात. डॉ. लाल सिंह म्हणाले, फ्लाय ॲश, कोळसा यामुळे खराब झालेली जमीन, पडीक जमिनीवरही बांबू लागवड केली जाऊ शकतो. शेतीत बांबूची लागवड करतेवेळी मातीचा प्रकार, पर्यावरण, पाण्याची उपलब्धता अशा सर्व बाबींचा विचार करून बांबूच्या जातीची निवड केली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
सुनील जोशी यांनी विदर्भात मोठ्या प्रमाणात जंगल असून वन कार्यालयदेखील आहे. विविध संस्था, तज्ज्ञ आहेत. ते एकत्र आल्यास भविष्यात विदर्भात बांबू क्षेत्रात अतुलनीय कार्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. अजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालन आशीष कासवा यांनी तर आभार आशिष नागपूरकर यांनी मानले. प्रियांका चतुर्वेदी, रवींद्र लष्करे, प्रताप गोस्वामी, शुभंकर पाटील यांनी प्रयत्न केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.