
Yavatmal News : राज्य शासनाने सलग दुसऱ्या वर्षी दिवाळीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात आनंदाचा शिधा वाटपास सुरुवात दिवाळीपूर्वीच झाली. जिल्ह्यात मात्र दिवाळीनंतरही जवळपास ८० हजार नागरिकांना आनंदाचा शिधा मिळालाच नाही.
पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ३२ हजार २४ पैकी चार लाख ३६ हजार ५२८ म्हणजेच ८२ टक्के शिधापत्रिकाधारकांपर्यंत शिधा पोहोचला आहे. जिल्ह्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना आणि शेतकरी लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्ताने जिल्ह्यातील पाच लाख ३२ हजार २४ कुटुंबांना आनंदाचा शिधा देण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले होते.
या वर्षी आनंदाच्या शिध्यामध्ये मैदा व पोहे अधिक देण्यात आले. शिधा जिन्नसांचा पुरवठा वेळेत न झाल्याने जिल्ह्यातील ८० हजारांवर लाभार्थी आनंदाचा शिधापासून वंचित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ८२ टक्के शिधावाटप करण्यात आला आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहता दारव्हा, उमरखेड, कळंब, बाभूळगाव तालुक्यात ९० टक्केपेक्षा अधिक वाटप झाले आहे.
आर्णी, दिग्रस, महागाव, पुसद, झरीजामणी, यवतमाळ, मारेगाव या तालुक्यात ८० टक्क्यांपेक्षा अधिक वाटप झाले आहे. नेर, वणी, घाटंजी तालुक्यात ७० टक्क्यांपेक्षा अधिक वाटप झाला आहे. केळापूर तालुक्यात ६८ टक्के वाटप झाला असून, राळेगाव तालुक्यात सर्वांत कमी ४४ टक्के शिधावाटप झाला आहे.
बायोमॅट्रिकसोबत ऑफलाइनची मुभा
गेल्या काही वर्षांपासून रेशन दुकानातील धान्याचे वाटप बायोमॅट्रिक पद्धतीने ऑनलाईन नोंदणी करूनच होत आहे. आनंदाचा शिधा वाटप करता असताना जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सर्व्हर डाऊनमुळे वितरणात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे आता शासनाने शिधा वाटप करत असताना बायोमॅट्रिकची सक्ती बंद केली आहे. पूर्वीच्या ऑफलाइन पद्धतीने वितरण करण्यास मुभा देण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.