Gondia News : यंदा ७९ केंद्रांच्या माध्यमातून २ लाख ९८ क्विंटल धान खरेदीचा टप्पा गाठता आला आहे. विशेष म्हणजे धान खरेदीची मुदत ३० जूनला संपणार आहे. त्यातच शासनाकडून निधीची उपलब्धता न झाल्याने ६५ कोटी रुपयांचे चुकारे थकल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये याकरिता शासकीय खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी होते. त्याकरिता जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या संस्थांचा उपयोग होतो.
खरीप आणि रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते. मात्र या वर्षी सुमारे दीड महिना उशिरा धान खरेदी सुरू झाल्याने त्याचा धान खरेदीवर परिणाम होत आवक मंदावली आहे. त्यातच खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल न झाल्याने आदिवासी विकास महामंडळाने यंदा धान खरेदीच केली नाही.
शासकीय केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी लागते. नोंदणीची मुदत ३१ मे पर्यंत होते. त्यानुसार पोर्टलवर जिल्ह्यातील १६७७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील ७२७६ शेतकऱ्यांकडून २ लाख ९८ हजार ९१९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
या धानाची किंमत ६५ कोटी २५ लाख ४२ हजार २९४ रुपये आहे. खरेदी करण्यात आलेल्या धानाचे चुकारे थकीत आहेत. खरिपाच्या तयारीत शेतकरी गुंतले असल्याने त्यांना सध्या पैशाची गरज आहे. मात्र शासनाकडून निधी वितरणासंदर्भाने हालचाली नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या हंगामात याच काळात सुमारे १५ लाख क्विंटल धान खरेदी झाली होती. परंतु यंदा केंद्र सुरू करण्यास झालेल्या विलंबामुळे धान आवक कमी झाली. ७९ केंद्रांवरून ही खरेदी होत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.