
Washin News : ‘‘ वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने निती आयोगाच्या माध्यमातून ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ अभियानाची ८३ कामे सुरू आहेत. त्यापैकी ५७ कामे पूर्ण झाली आहेत. त्यातून सहा लाख ६७ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जलशक्ती अभियान’, ‘जलयुक्त शिवार’ व ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेचा आढावा श्री. षण्मुगराजन यांनी घेतला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, लक्ष्मण मापारी, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिसा महाबळे आदी उपस्थित होते.
षण्मुगराजन म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या १६६ गावांमध्ये जलसंधारणाची कामे करताना या अभियानातून नाला खोलीकरणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. जलशक्ती अभियान आराखड्यातील कामे जलशक्ती अभियान पोर्टलवर अपलोड करावीत.
जल पुनर्भरणाची व वृक्ष लागवडीची कामे मोठ्या प्रमाणात करावी. विहीर पुनर्भरणाची कामे देखील करावीत. नदी किनाऱ्यावरील गावांत नदी काठांवरील मोकळ्या जागेत वृक्षारोपणासाठी विशेष जाहीर सभा घ्यावी.’’
‘‘जलयुक्त शिवार अभियानात ज्या गावांमध्ये अद्यापही कामे सुरू झालेले नाहीत, त्या गावातील कामांची तातडीने प्रशासकीय मान्यता घेऊन ही कामे सुरू करावीत. त्यासाठी निधीची कोणतीही अडचण येणार नाही. आवश्यकता असल्यास शासनाकडे निधीची मागणी करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक तालुक्यात एक काम सुरू करावे. ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेतून जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.