New Delhi News : लोकसभा निवडणुकीचे सहाव्या टप्प्यातील मतदान शनिवारी (ता. २५) पार पडले. या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मशिनमध्ये बंद झाले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मतदानाची सरासरी टक्केवारी ५७.७० टक्के इतकी होती. पश्चिम बंगालमध्ये बंपर म्हणजे ७७.९९ टक्के मतदान झाले. याशिवाय झारखंडमध्ये ६१.४१ तर ओडिशामध्ये साठ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते.
सहाव्या टप्प्यात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यात उत्तर प्रदेशातील १४, हरियानातील सर्व १०, प. बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील सर्व ७, ओडिशातील ६, झारखंडमधील ४ तर जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश होता. ५८ जागांसाठी ८८९ उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशा विधानसभेच्या ४२ जागांसाठी सुद्धा शनिवारी मतदान झाले.
या टप्प्यात ज्या प्रमुख नेत्यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मशिनमध्ये बंद झाले, त्यात हरियानाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (करनाल), पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती (अनंतनाग, राजौरी), केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (संबलपूर), भाजपचे नेते संबित पात्रा (पुरी), मेनका गांधी (सुलतानपूर), मनोज तिवारी (ईशान्य दिल्ली), अभिजित गंगोपाध्याय (तामलुक), अग्निमित्रा पॉल (मेदिनीपूर), नवीन जिंदाल (कुरुक्षेत्र), दिनेशलाल निरहुआ (आझमगड), आप नेते सोमनाथ भारती (नवी दिल्ली), कॉंग्रेसचे राज बब्बर (गुरुग्राम), दीपेंद्र सिंह हुडा (रोहतक), कुमारी सेलजा (सिरसा) आदींचा समावेश आहे.
५८ जागांवरील मतदानासाठी अकरा कोटींपेक्षा जास्त मतदार पात्र होते. यात ५.८४ कोटी पुरुष तर ५.२९ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. गत म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर ५८ पैकी ४० जागा भाजपने जिंकल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये ५२.२४ टक्के, हरियानात ५५.९३ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये ५१.३५ टक्के तर उत्तर प्रदेशात ५२.०२ टक्के इतके मतदान झाले होते. सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यातले मतदान शिल्लक राहिले आहे. येत्या १ जून रोजी ८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ५७ जागांसाठी हे मतदान होईल. त्यानंतर ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी मतदान केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदानाचा हक्क बजावला. ‘माझे वडील, मी, माझी पत्नी, मुले यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला आहे. माझ्या आईची प्रकृती बरी नाही त्यामुळे ती मतदान करू शकली नाही. मी हुकूमशाहीच्या विरोधात, बेरोजगारीच्या आणि महागाईच्या विरोधात मतदान केले आहे,’ असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्या टप्प्याच्या निमित्ताने मतदारांनी भरघोस मतदान केले पाहिजे, असे म्हटले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.