
Nagpur News : हंगामाच्या सुरुवातीला आणि अखेरीस दर वाढतील अशी संत्रा बागायतदारांची अपेक्षा यंदा फोल ठरली आहे. त्यामुळेच आंबिया बहारातील सुमारे ४० हजार टन विक्रीअभावी झाडावरच असल्याची माहिती महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिली. सध्या संत्रा फळांना २० ते २७ रुपये प्रती किलो असा दर मिळत आहे.
राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड असून त्यापैकी १ लाख हेक्टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. नागपूरमध्ये २५ हजार, तर उर्वरित महाराष्ट्रात २५ हजार याप्रमाणे ५० हजार क्षेत्र विभाजित आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागातील संत्र्याचा दर्जा उर्वरित भागापेक्षा चांगला असल्याने या भागातील संत्र्याला मागणीदेखील अधिक असते.
त्यातही दर्यापूर (अमरावती) बुलडाणा, अकोट (अकोला) या भागांतील संत्रा काढणीस लवकर येतो. २ ते १५ सप्टेंबर या कालावधीत या भागात संत्रा तोडणीस येतो, तर उर्वरित भागात सप्टेंबर अखेरीस आंबिया बहारातील फळे काढणीस येतात. परिणामी, लवकर काढणीस येणाऱ्या बागायतदारांना चांगला दरही मिळतो.
आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांची मागणी सुरुवातीच्या आंबट-गोड चवीच्या संत्रा फळांना मागणी राहते. त्याचाही परिणाम दरावर होतो, असे सांगितले जाते. नागपूर, वरुड, जलालखेडा भागांतील बागायतदार हंगाम अखेरीस दर वाढतील या अपेक्षेने बागेतील फळ काढणी उशिरा करतात. हंगामा अखेरीस फळातील गोडवा वाढतो.
अशा फळांना देखील काही राज्यांची मागणी राहते. आंबिया बहारातील एकूण साडेचार लाख टन उत्पादनांपैकी यंदाही सुमारे ४० हजार टन संत्रा दरवाढीच्या अपेक्षेने बागेतील झाडावर आहे. परंतु दर २० ते २७ रुपये प्रती किलोवर स्थिर असल्यामुळे संत्रा बागायतदारांची अडचण वाढली आहे. यापेक्षा अधिक दर मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.