Water Scarcity : मराठवाड्यात १४४ लघू, मध्यम प्रकल्प कोरडे

Water Issue : आटते पाणीसाठे आणि घटता भूजलसाठा यामुळे मराठवाड्यात पाणीटंचाईची स्थिती भीषण होत आहे.
Water Project
Water Project Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील एकूण ८२४ लघू-मध्यम प्रकल्पांपैकी १४४ प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये बीड, धाराशिव, जालनामधील सहा मध्यम प्रकल्पांसह छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूरमधील १३८ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. आटते पाणीसाठे आणि घटता भूजलसाठा यामुळे मराठवाड्यात पाणीटंचाईची स्थिती भीषण होत आहे.

कोरडे पडलेल्या मध्यम प्रकल्पांत बीडमधील तीन, धाराशिवमधील दोन व जालन्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे. मध्यम प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये धाराशिवमधील १०, बीडमधील ५, जालनामधील ४, लातूरमधील ३, परभणीतील २, नांदेड व छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

Water Project
Water Scarcity : भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद

कोरड्या पडलेल्या १३८ लघू प्रकल्पांत धाराशिवमधील सर्वाधिक ६६, बीडमधील ४९, छत्रपती संभाजीनगरमधील १२ व लातूरमधील ११ प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय ३०६ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये धाराशिवमधील ९१, लातूरमधील ७३, बीडमधील ४६, छत्रपती संभाजीनगरमधील ३१, नांदेडमधील २२, परभणीतील १८, जालन्यातील १४ व हिंगोलीतील ११ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय लघू-मध्यम-मोठ्या प्रकल्पांची स्थिती

छत्रपती संभाजीनगर जिल्हा : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय १६ मध्यम प्रकल्पांत केवळ चार टक्के, तर ९८ लघू प्रकल्पांत ८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जालना जिल्हा : जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांत केवळ ३ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. याशिवाय ५७ लघू प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. बहुतांश प्रकल्प आटले असून या प्रकल्पांमध्ये नसलेल्या पाण्यामुळे चिंता वाढली आहे.

Water Project
Water Issue : पाण्यासाठी उसनवारी, ऊसपट्टा व्याकूळ

बीड : जिल्ह्यातील माजलगाव या मोठ्या प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंब नाही म्हणजे हा प्रकल्प मृत साठ्यात गेला आहे. दुसरीकडे मांजरा या दुसऱ्या मोठ्या प्रकल्पात केवळ २ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ १३ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक संख्येने असलेल्या १२६ लघू प्रकल्पांत केवळ ५ टक्के उपयुक्त पाण्याचा साठा शिल्लक आहे.

लातूर : जिल्ह्यातील १३४ लघू प्रकल्पांत केवळ ८ टक्के उपयुक्त पाण्याचा साठा शिल्लक आहे. दुसरीकडे याच जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पांत केवळ ४ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

धाराशिव : जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांत केवळ २ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. यापैकी २ प्रकल्प कोरडे पडले आहेत. सर्वाधिक संख्येने असलेल्या २०६ लघू प्रकल्पांत केवळ ८ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. या लघू प्रकल्पांपैकी तब्बल ६६ प्रकल्प कोरडे पडले आहेत. जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेला सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठा मृत साठ्यात गेला आहे.

नांदेड : जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांत १८ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. दुसरीकडे ८० लघू प्रकल्पांत २० टक्के उपयुक्त पाण्याचा साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून एका मध्यम प्रकल्पाची तीच अवस्था आहे. या जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांपैकी निम्न मनार प्रकल्पात २६ टक्के तर विष्णुपुरी प्रकल्पात २७ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

परभणी : जिल्ह्यातील दोन्ही मध्यम प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. सर्वात मोठ्या प्रकल्पात केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांत केवळ ४ टक्के उपयुक्त पाणी उरले आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील सिद्धेश्वर या एकमेव मोठ्या प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. प्रकल्प मृतसाठ्यात गेला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पांत केवळ ७ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com