Amravati News : पावसाची तूट राहिल्याने भूजलाचे पुनर्भरण झाले नाही. त्यामुळे १३ तालुक्यांतील भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे. त्याचा फटका बसत मार्च अखेर ४८३ गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून ५०८ उपाययोजनांसाठी १२.७१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने खंड दिला. तब्बल तीन आठवड्यांचा मॉन्सूनला विलंब झाला. त्यानंतरही ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवसांचा पावसाचा खंड होता. त्यामुळे जिल्ह्यात चांदूरबाजार वगळता उर्वरित १३ तालुक्यांमध्ये ३१ टक्के पावसाची तूट राहिली. अशा परिस्थितीत जानेवारी अखेरपासून जलस्रोत कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे.
या परिस्थितीचे गांभीर्य जाणत जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला कृती आराखडा तयार करण्यासाठी स्मरणपत्र देण्यात आले. त्यामुळे जागे झालेल्या पाणीपुरवठा विभागाकडून जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत संभावित गावात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या अनुषंगाने आराखडा तयार केला आहे.
तब्बल ४८३ गावांसाठी १२.७१ कोटी रुपयांचा निधी याकरिता अपेक्षित करण्यात आला आहे. मेळघाटातील उंच भागात असलेल्या काही गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. रबी हंगामातील पिके जगविण्यासाठी भूजलातील पाण्याचा अमर्याद उपसा केला जात आहे. त्याच्या परिणामी येत्या काळात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संभाव्य टंचाईग्रस्त गावे ४८३
कूपनलिका, विंधन विहिरी १६४
विहीर अधिग्रहण, नळ योजनांची दुरुस्ती १६८
तात्पुरत्या नळ योजना १५८
टॅंकर ०५
एकूण उपाययोजना १३
अपेक्षित खर्च १२.७० कोटी रुपये
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.