Chhatrapati Sambhajinagar : पावसाळा सुरू होताच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत नैसर्गिक आपत्तीचा कहर सुरू आहे. तब्बल १४ जणांचा नैसर्गिक आपत्तीत जीव गेला असून त्यापैकी ११ जणांचा मृत्यू हा अंगावर वीज पडून झाल्याची माहिती समोर आली.
मराठवाड्यात लोकसभा निवडणूक संपताच मुख्यमंत्र्यांनी टंचाई व दुष्काळ आढावा बैठक घेतली होती या बैठकीत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्या सूचनांचे पुढे काय झाले हे अजून गुलदस्त्यात आहे. असे असताना १ ते १२ जून दरम्यान १२ दिवसात नैसर्गिक आपत्तीने मृत्यू पावलेल्यांची संख्या १४ वर पोहोचली आहे.
शिवाय ११ जण या नैसर्गिक आपत्तीत जखमीही झाले आहेत. जालना, हिंगोली, बीड, धाराशिव या चार जिल्ह्यांत प्रत्येकी एक, नांदेड-परभणीमधील प्रत्येकी तीन तर लातूर जिल्ह्यात सर्वाधिक चार जणांचा मृत्यू १२ दिवसांतील नैसर्गिक आपत्तीत झाला आहे. यापैकी ११ जणांचा मृत्यू अंगावर वीज पडून झाला.
एका व्यक्तीचा मृत्यू वादळी वाऱ्यामुळे गोठा पडून तर दोघांचा मृत्यू पुरात वाहून गेल्याने झाला. याशिवाय नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्या ११ जणांमध्ये लातूरमधील ३, जालन्यातील ६, परभणी व धाराशिवमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. वीज पडून मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करणे महत्त्वाचे आहे हे अधोरेखित होते.
२५१ जनावरांचेही गेले प्राण
नैसर्गिक आपत्तीत केवळ मनुष्याचेच नव्हे तर तब्बल २५१ जनावरांचेही प्राण गेले आहेत. त्यामध्ये लातूरमधील सर्वाधिक ९३, त्यापाठोपाठ नांदेडमधील ३९, बीडमधील ३७, धाराशिवमधील ३५, जालन्यातील २२, हिंगोलीतील १०, परभणीतील ९, छत्रपती संभाजीनगरमधील ६, लहान-मोठ्या दुधाळ व ओढकाम करणाऱ्या जनावरांचा समावेश आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.